मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून वचननामा जाहीर करण्यात आला आहे. उद्धव ठाकरे यांनी आज वचननामा जाहीर केला. ठाकरे गटाच्या वचननाम्यामध्ये महिला, शेतकरी, शिक्षण आणि आरोग्याबाबत मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी आपल्या वचननाम्यामध्ये नेमक्या काय घोषणा केल्या आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. वचननामा जाहीर करताना उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, ‘निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. मविआची सभा यशस्वीरीत्या पार पडली. आम्ही मतं मागायची आणि लोकांनी द्यायची असं मला पटत नाही. लोकांनी आम्हाला का मतं द्यायची. काल आम्ही पंचसूत्री जाहीर केली. आजपासून मी महाराष्ट्र फिरतोय. १० तारीखला पत्रकार परिषद होऊ शकते. त्यांनी मला सांगितलं काल. पण त्या दिवशी कदाचित मी नसेल. त्यामुळे लगेच महाविकास आघाडीत बिघाडी असं नाही.’
तसंच, ‘२०२० ची पालिका निवडणूक होती. तेव्हा वचननामा जाहित केला होता. मुंबईसाठी सागरी मार्गाचं आश्वासन दिलं होतं. मला अभिमान आहे ते आम्ही पूर्ण करून दाखवलं. मालमत्ता कर माफ करणार जे आश्वासन दिलं होतं ते पूर्ण केलं. शिवभोजन थाळी सुरू केली. हा वचननामा दोन प्रकारात असेल. फार काही वेगळा वचननामा नाही. पण थोडी फार काही वचने आहेत ती दिली जातील. मविआच्या इतर पक्षांना देखील मान्य आहे. मविआचा देखील वचननामा येईल. धारावीत आम्ही वित्तीय केंद्र उभारु, तरुण तरुणींना रोजगार उपलब्ध करू. गृहनिर्माण धोरण तयार करू.’, असेही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.





