वृत्तसंस्था : लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे गरजेचे आहे. दरम्यान, केवायसी न केल्यास तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. याचसोबत केवायसीमध्ये जर तुम्ही चुकीची माहिती दिली असेल तर तुमचा लाभ बंद होणार आहे. दरम्यान, आता या योजनेच्या केवायसीसंदर्भात अजून एक महत्त्वाचा नियम लागू केला आहे. आता या योजनेत लाभार्थी महिलांसोबतच त्यांच्या वडील किंवा पतीची केवायसीदेखील करावी लागणार आहे. लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांची संख्या अजून घटण्याची शक्यता आहे. लाडकी बहीण योजनेत केवायसीमधून अनेक महिला अपात्र ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानंतर आता महिलांच्या पती किंवा वडिलांचीही केवायसी केली जाणार आहे. त्यामुळे महिलांच्या पतीचे किंवा वडिलांचे वार्षिक उत्पन्न किती आहे याचीही पडताळणी केली जाणार आहे.
या योजनेच्या लाभार्थी महिलेचे लग्न झाले असेल तर पतीचे उत्पन्न किती आणि महिला जर अविवाहित असेल तर वडिलांचे उत्पन्न किती याबाबत माहिती द्यावी लागणार आहे.जर त्यांचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त असेल तर त्या महिलांचे लाभ बंद केले जाणार आहे. याआधीही पडताळणीत अनेक महिलांच्या कुटुंबाचे उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त असल्याचे समोर आले होते. त्यानंतर आता केवायसीमधून सर्व निकषाबाहेर बसणाऱ्या महिलांना फटका बसणार आहे. त्यांचे लाभ बंद केले जाणार आहे. लाडकी बहीण योजनेत केवायसी करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी दिलेला आहे. तुम्हाला तोपर्यंत केवायसी करणे अनिवार्य आहे. अन्यथा तुम्हाला या योजनेचा पुढील हप्ता मिळणार नाहीये. लाभार्थ्यांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन केवायसी करायची आहे.







