रायगड : खोपोली शहरातील ऐतिहासिक आणि पेशवेकालीन वीरेश्वर तलावालगत असलेल्या वीरेश्वर मंदिरात अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीनंतर धाडसी चोरी करत शिवलिंगावरील ११ किलोहून अधिक वजनाची चांदीची पिंड लंपास केली. मंदिराच्या मागील दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केलेल्या चोरट्यांनी गाभाऱ्यातील चांदीचा कळस आणि शिवलिंगाखालील चांदीचे आच्छादन चोरी करून पलायन केले. चोरीनंतर आरोपींनी मंदिराच्या संरक्षण भिंतीवरून उडी मारून पळ काढल्याचे मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून आले आहे. या घटनेमुळे खोपोली शहरासह परिसरात मोठी खळबळ उडाली असून भाविकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. रविवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास मंदिरातील साफसफाई आणि नित्यपूजेसाठी पुजारी तसेच नियमित भाविक मंदिरात आले असता मंदिराच्या मागील आणि मुख्य गाभाऱ्याच्या दरवाजाचे कुलूप तुटलेले असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. संशय आल्याने गाभाऱ्याची पाहणी केली असता शिवलिंगावरील चांदीची पिंड, कळस आणि पिंडीखालील चांदीचे आच्छादन चोरीला गेल्याचे उघड झाले.
घटनेची माहिती मिळताच मंदिराचे विश्वस्तांनी तातडीने खोपोली पोलिसांना कळविले. त्यानंतर खोपोली पोलीस, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि न्यायवैद्यक (फॉरेन्सिक) पथकाने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. मंदिर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यामध्ये दोन चोरटे चांदीची पिंड घेऊन पळून जाताना आणि मंदिराच्या भिंतीवरून उडी मारून पसार होताना दिसत असल्याची माहिती समोर आली आहे. या धागेदोऱ्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके कार्यरत आहेत. खोपोली आणि खालापूर तालुक्यातील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या या ऐतिहासिक मंदिरात झालेल्या चोरीमुळे शहराच्या सुरक्षेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे मंदिर शहराच्या मध्यवर्ती आणि दाट लोकवस्तीच्या परिसरात असूनही चोरट्यांनी धाडसी चोरी करण्यात यश मिळविल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. चोरीस गेलेली चांदीची पिंड हस्तगत करणे आणि आरोपींना तातडीने अटक करणे हे पोलिसांसमोरील मोठे आव्हान बनले असून, या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.






