नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेच्या कोपरखैरणे येथील सीबीएसई बोर्डाच्या शाळेत अपुरे शिक्षक असल्याने, गेल्या दोन वर्षांपासून गोंधळ सुरू आहे. यंदाही नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले, तरी शिक्षकांची भरती झालेली नाही. त्यामुळे अपुऱ्या शिक्षकांच्या बळावरच शाळेचा कारभार चालवण्यासाठी नव्याने वेळापत्रक आखण्यात आले आहे. यानुसार एका दिवसाआड वर्ग भरवले जात आहेत, तर सहावीच्या एका वर्गात तर तब्बल १६० विद्यार्थ्यांची भरती करण्यात आलेली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यावर्षी पटसंख्या वाढल्याने शिक्षकांची कमतरता अधिक तीव्रतेने जाणवत आहे. कोपरखैरणे येथील महापालिकेच्या सीबीएसई बोर्डाच्या शाळेत मागील दोन वर्षांपासून शिक्षकांची संख्या अपुरी आहे. त्यामुळे शिक्षकांची भरती करण्याची मागणी होत आहे. मात्र याकडे गेल्या वर्षांपासून व्यवस्थापनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यातच, यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून सहावीचा वर्ग वाढला असून, शाळेची पटसंख्या एक हजार ३६५पर्यंत गेली आहे. मात्र, त्यांना शिकवण्यासाठी मुख्याध्यापकांसह केवळ दहा शिक्षकच आहेत.
या पार्श्वभूमीवर, यावर्षी शाळा सुरू झाल्यावर, शाळेने पालकांना नवीन वेळापत्रक पाठवले आहे. यानुसार, इयत्ता पहिली व दुसरीचे वर्ग सोमवारी व बुधवारी भरवण्यात येत आहेत. या इयत्तांच्या चार तुकड्यांऐवजी दोनच तुकड्या करण्यात आल्या आहेत. इयत्ता तिसरी व पाचवीचे वर्ग मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी भरणार आहेत. तिसरीच्या दोन, चौथीची एक व पाचवीची एकच तुकडी केली आहे. सहावीचे वर्ग नियमित भरवण्यात येणार आहेत. मात्र, या इयत्तेची तब्बल १६० विद्यार्थ्यांची एकच तुकडी करण्यात आली आहे. आठवड्यातून केवळ दोन दिवस शाळा घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याने पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. करोनाकाळात आधीच विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. करोनानंतर शाळेचे हे दुसरे वर्ष आहे. विद्यार्थ्यांचे अशा पद्धतीने शैक्षणिक नुकसान होणे भयावह असून याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज पालकांनी व्यक्त केली आहे.
दर्जेदार शिक्षणाचा दावा करणाऱ्या महापालिकेच्या शाळेत अशी परिस्थिती कोणामुळे ओढवली? महापालिकेला ही शाळा बंद करायची आहे का, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केला आहे. विद्यार्थ्यांची गैरसोय लक्षात घेऊन लवकरात लवकर शिक्षकभरती करण्याची मागणी मनविसेने महापालिका आयुक्तांकडे केली आहे. जून अखेरपर्यंत शिक्षक भरती प्रक्रिया पूर्ण करणार असल्याचे आश्वासन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी दिले आहे.