मुंबई : मुंबईसह राज्यातील सर्वसामान्यांच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृहनिर्माण संस्थांची घरे उपलब्ध करण्याकरिता गृह निर्मितीचा वेग वाढविण्यासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ‘म्हाडा’ मुंबई मंडळाच्या घरांच्या लॉटरीची सोडत मुख्यमंत्री श्री.शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काढण्यात आली. त्यावेळी मुख्यमंत्री श्री.शिंदे बोलत होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, आमदार मंगेश कुडाळकर, गृहनिर्माण विभागाच्या अपर मुख्य सचिव वल्सा नायर, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा उपाध्यक्ष संजय जयस्वाल, समितीचे अध्यक्ष जॉनी जोसेफ उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री.शिंदे म्हणाले की, स्वतःचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. हे स्वप्न साकार करण्यासाठी आता एका घरासाठी ३० अर्ज आहेत. ते प्रमाण एकास ५ पर्यंत आणण्यासाठी ‘म्हाडा’ सारख्या शासनाच्या संस्थांना आवश्यक सहकार्य करण्यात येईल. त्यामुळे लवकरच सर्वसामान्यांचे स्वप्न, हक्काचा निवारा साकार होण्यास मदत होईल.
‘म्हाडा’वरील लोकांचा विश्वास वाढतोय. यामुळेच या सोडतीसाठी १ लाख २० हजार १४४ अर्ज आले.हा विश्वास सार्थ ठरविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. ‘म्हाडा’च्या घरांची लॉटरी पारदर्शकपणे काढण्यात येत आहे. यामध्ये मानवी हस्तक्षेप नाही. पूर्णपणे संगणकीकृत पद्धतीचा वापर केला आहे. ‘म्हाडा’च्या या सोडतीमुळे मुंबईकर पुन्हा मुंबईत येऊ शकणार आहेत. मुंबईतील रखडलेल्या प्रकल्पांना चालना देण्यात येणार आहे. त्याकरिता कायद्यात दुरुस्ती करणे आवश्यक असल्यास ते करणार असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सांगितले. गिरणी कामगारांना घरांच्या चाव्या देण्यात आल्या. धारावीसारखा प्रकल्प सुरु होत आहे. देशातील सर्वात मोठा ट्रान्स-हार्बर समुद्रावरील रस्ता एक वर्षात सुरु होत आहे. प्रवाशी मुंबईतून २० मिनिटांत रायगड जिल्ह्यात जाऊ शकणार आहेत. कोस्टल रोड, मेट्रो यामुळे मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा मिळाला आहे. ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमामुळे १.५ कोटी नागरिकांना लाभ मिळाला आहे. आरोग्य सुविधा निर्माण करण्यात येत आहेत. पंढरपूरचा विकास करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले.
उपमुख्यमंत्री श्री.फडणवीस म्हणाले की, ‘म्हाडा’ला मोफत जमीन मिळते त्यामुळे म्हाडाच्या घरांच्या किमती खासगी बिल्डरांच्या घरांपेक्षा कमी असणे आवश्यक आहे. शासनाचेही हेच स्वप्न आहे, की सर्वसामान्यांना कमी किमतीत घरे उपलब्ध व्हावीत यासाठी शासन ‘म्हाडा ’च्या घरांच्या किमती कमी करण्यासाठी प्रयत्न करील आणि पुढील सोडतीमधील घरांच्या किमती इतर घरांपेक्षा कमी असतील. ‘म्हाडा’ने अधिकाधिक घरे निर्माण करावीत. मुंबईतील नागरिकांची मागणी वाढली आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात घरे निर्माण करावीत. नवी मुंबईत अनेक सोयी-सुविधा निर्माण झाल्या आहेत. सर्वसामान्य जनतेला त्यांच्या उमेदीच्या काळात घराचे स्वप्न साकार झाले. तर त्याचा मोठा आनंद संबंधितांच्या परिवारास होतो. त्यामुळे गृहनिर्माण प्रकल्पांचा वेग वाढविण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे. म्हाडा पारदर्शकपणे सोडत काढून जनतेचा विश्वास जिंकत आहे. म्हाडा पुनर्विकास करण्यासाठी प्रयत्न करीत आहे. नवनवीन योजना राबवित असल्याचे उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी सांगितले. गृहनिर्माण मंत्री श्री. सावे म्हणाले की, घरांची मागणी वाढत आहे. लवकरच पुढील सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीमध्ये ज्यांना घराची लॉटरी लागली नाही, त्यांना पुढच्या लॉटरीत कागदपत्रांची पडताळणीची आवश्यकता असणार नाही. गृहनिर्माण प्रकल्पांची त्यांनी यावेळी सविस्तर माहिती दिली. यावेळी म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जयस्वाल यांनी प्रास्ताविक केले. अपर मुख्य सचिव वल्सा नायर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.