वृत्तसंस्था : सनातन धर्मातील अत्यंत पवित्र मानली जाणारी चारधाम यात्रा यंदा रविवार, १९ एप्रिलपासून सुरू होत आहे. अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर यात्रेला प्रारंभ होत असून, सर्वप्रथम गंगोत्री मंदिर आणि यमुनोत्री धामांचे दरवाजे भाविकांसाठी उघडले जाणार आहेत. परंपरेनुसार या दोन तीर्थक्षेत्रांच्या दर्शनानंतर भाविक Badrinath Temple (भगवान विष्णू) आणि केदारनाथ मंदिर (भगवान महादेव) यांच्या दर्शनासाठी पुढे जातात. हिमालयातील दुर्गम भाग, बदलते हवामान आणि मोठ्या प्रमाणातील गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने सुरक्षेसह सुविधा वाढवल्या असून, वाहतूक, निवास, आरोग्य व आपत्कालीन व्यवस्थांवर विशेष भर देण्यात आला आहे. यात्रेच्या सुरुवातीपासूनच मोठी गर्दी अपेक्षित असल्याने राज्य सरकार आणि मंदिर समित्यांनी सर्व तयारी पूर्ण केली आहे.
यंदा यात्रेत शिस्त राखण्यासाठी आणि पावित्र्य जपण्यासाठी कठोर नियम लागू करण्यात आले आहेत. विशेषतः बद्रीनाथ आणि केदारनाथ मंदिर परिसरात मोबाईल फोन नेण्यास पूर्णतः मनाई करण्यात आली आहे. भाविकांनी मोबाईल सोबत आणल्यास तो मंदिराबाहेरील ‘क्लोक रूम’मध्ये जमा करणे बंधनकारक असेल. दर्शनानंतर तो परत मिळेल, ज्यामुळे प्रवेशद्वारांवरील गर्दी नियंत्रणात राहण्यास मदत होणार आहे. याशिवाय, मंदिर परिसरात व्हिडिओ शूटिंग, शॉर्ट फिल्म्स किंवा सोशल मीडियासाठी रील्स बनवण्यावरही संपूर्ण बंदी घालण्यात आली आहे. धार्मिक स्थळांची शांतता आणि श्रद्धेचे वातावरण अबाधित राहावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.







