ठाणे : जिल्हा परिषद प्रशासनातील कार्यालयीन शिस्त, जबाबदारी आणि कार्यक्षमता अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी गुरुवारी जिल्हा परिषद मुख्यालयात आकस्मिक भेट देत विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीची तपासणी केली. यावेळी त्यांनी विभागनिहाय हजेरी पत्रकांची पाहणी करून प्रत्यक्ष उपस्थितीची पडताळणी केली. कार्यालयीन वेळेत अनुपस्थित अथवा विनापरवानगी गैरहजर आढळलेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची स्वतंत्र नोंद घेण्यात आली असून संबंधितांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच विविध विभागांतील कामकाजाचा आढावा घेत नागरिकांकडून प्राप्त होणारे अर्ज, तक्रारी आणि विविध प्रकरणांचा निपटारा वेळेत होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कार्यालयीन कामकाजात अनावश्यक विलंब टाळून प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने आपल्या जबाबदाऱ्यांचे काटेकोरपणे पालन करावे, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद ही ग्रामीण भागातील नागरिकांना शिक्षण, आरोग्य, पाणीपुरवठा, महिला व बालविकास, समाजकल्याण, कृषी तसेच विविध विकास योजनांच्या माध्यमातून थेट सेवा देणारी महत्त्वाची यंत्रणा असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियमित उपस्थिती आणि तत्पर सेवा अत्यंत आवश्यक असल्याचे यादव यांनी नमूद केले. सर्व विभागप्रमुखांना उपस्थिती, कामकाजाची गुणवत्ता आणि प्रलंबित प्रकरणांचा नियमित आढावा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. कार्यालयीन वेळेचे काटेकोर पालन करून नागरिकांना वेळेत आणि दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले. “जिल्हा परिषद प्रशासन हे नागरिकांच्या सेवेसाठी आहे. वेळेचे पालन, शिस्त आणि जबाबदारीची जाणीव ही प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याची प्राथमिक कर्तव्ये आहेत. विनापरवानगी अनुपस्थिती, कामातील दिरंगाई किंवा निष्काळजीपणा आढळल्यास कार्यवाही करण्यात येईल. पारदर्शक, उत्तरदायी आणि लोकाभिमुख प्रशासन उभारण्यासाठी अशा आकस्मिक तपासण्या नियमितपणे सुरू राहतील,” असे रणजित यादव यांनी स्पष्ट केले. नागरिकांना अधिक चांगल्या आणि वेळेत सेवा मिळाव्यात यासाठी प्रशासन सातत्याने उपाययोजना करत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.







