मुंबई : पर्यावरण संवर्धन आणि प्लास्टिकमुक्त परिसराच्या दिशेने पश्चिम रेल्वे प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. रेल्वे स्थानके तसेच लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांमधून निर्माण होणारा प्लास्टिक बाटल्यांचा कचरा कमी करण्यासाठी प्लास्टिक क्रॅशर यंत्रांचा वापर करण्यात येणार आहे. या यंत्रांमध्ये प्लास्टिक बाटल्यांचा चुरा करून त्यापासून प्रवाशांसाठी बाकडे तयार करण्यात येतील. भारतीय रेल्वेने ‘सिंगल यूज प्लास्टिक’विरोधात व्यापक मोहीम सुरू केली असून, त्याचाच एक भाग म्हणून पश्चिम रेल्वेच्या विविध विभागांमध्ये हा पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात येत आहे. रेल्वे स्थानकांवर संकलित करण्यात आलेल्या प्लास्टिक बाटल्यांचा चुरा करून त्यावर प्रक्रिया केली जाईल. त्यानंतर ८ बाय ४ फुटांचे बोर्ड तयार करून त्यापासून बाकड्यांची निर्मिती केली जाणार आहे. एका बाकड्यासाठी सुमारे ४० ते ५० किलो प्लास्टिक चुऱ्याचा वापर होणार असल्याने प्लास्टिक कचऱ्याचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.
पश्चिम रेल्वेच्या विविध विभागांमध्ये प्लास्टिक क्रॅशर यंत्रांचे जाळे उभारण्यात आले आहे. वडोदरा विभागातील १३ स्थानकांवर १८ यंत्रे, रतलाम विभागातील पाच स्थानकांवर पाच यंत्रे, तर अहमदाबाद विभागातील सहा स्थानकांवर २६ यंत्रे कार्यरत आहेत. याशिवाय राजकोट विभागातील सहा स्थानकांवर सहा यंत्रे आणि भावनगर विभागातील जुनागड स्थानकावर एक यंत्र बसविण्यात आले आहे. पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागात यापूर्वीही प्लास्टिक बाटल्यांच्या चुऱ्यापासून तयार करण्यात आलेली बाकडे चर्चगेट स्थानकावर प्रवाशांसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. मात्र संबंधित कंत्राटदाराचा करार संपल्यानंतर नवीन बाकड्यांचे काम काही काळ थांबले होते. आता नवीन निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, लवकरच अधिक प्लास्टिक क्रॅशर यंत्रे बसवून बाकड्यांच्या निर्मितीला पुन्हा गती दिली जाणार आहे. त्यामुळे प्लास्टिक कचऱ्याचा पुनर्वापर वाढण्याबरोबरच रेल्वे स्थानकांवरील स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनालाही चालना मिळणार आहे.







