मुंबई : सध्या जगभरात सर्वत्र एआयचा वापर केला जात आहे. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण एआयचा वापर करतात. एआयमुळे अनेक गोष्टी काही सेकंदातच तयार होतात. दरम्यान, आता शालेय विद्यार्थ्यांनाही एआय शिकवले जाणार आहे. त्यांच्या अभ्यासक्रमात एआयचा समावेश केला जाणार आहे. तिसरीपासून विद्यार्थ्यांना एआय शिकवले जाणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन त्यांना शिक्षण दिले जाणार आहे. केंद्र सरकारने शालेय अभ्यासक्रमात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) समाविष्ट करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. या अंतर्गत, ‘तिसरीपासून एआय शिकविण्याचा निर्णय’ घेण्यात आला असून, २०२६-२७ या शैक्षणिक वर्षापासून याची अंमलबजावणी देशभरातील सर्व शाळांमध्ये केली जाईल.
केंद्र, राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील सर्व शाळांसाठी हा अभ्यासक्रम लागू होणार आहे. यासाठी आयआयटी मद्रासचे प्राध्यापक कार्तिक रमण यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. जी अभ्यासक्रमाची रचना करेल. या देशव्यापी योजनेअंतर्गत सुमारे एक कोटी शिक्षकांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांना भविष्यातील डिजिटल अर्थव्यवस्थेसाठी तयार करणे, हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे. सध्या सीबीएसईच्या शाळांमध्ये काही वर्गांसाठी एआय आधारित विषय शिकवले जातात. नवीन पिढी ही कोणतेही तंत्रज्ञान लगेच स्विकारते. एआय एक नव्या तंत्रज्ञानाचे आव्हान आणि संधी आहे. ही संधी विद्यार्थ्यांसाठी चांगली ठरणार आहे.यासाठी जवळपास १ कोटींपेक्षा जास्त शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. एआय निगडीत अभ्यासक्रम आणि संकल्पना शिकवण्यासाठी शिक्षकांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. सध्या सीबीएसईच्या १८ हजारांपेक्षा जास्त शाळांमध्ये एआय शिकवले जात आहे.







