पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २८ जून रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेबाबत महत्त्वाचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. महिला उमेदवारांना परीक्षेदरम्यान बुरखा, हिजाब, दुपट्टा, ओढणी किंवा इतर पारंपरिक वेशभूषा परिधान करण्याची मुभा राहणार असली तरी परीक्षा केंद्रातील वर्गखोलीत त्यांचा चेहरा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये स्पष्टपणे दिसणे आवश्यक असणार आहे. उमेदवाराची ओळख पडताळणी, बायोमेट्रिक तपासणी आणि परीक्षेतील पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी मानेच्या वरचा भाग, म्हणजे चेहरा, कान आणि डोके कोणत्याही प्रकारच्या आवरणाशिवाय स्पष्ट दिसणे आवश्यक असल्याचे परीक्षा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले आहे. यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या नियमावलीत दुपट्टा, बुरखा आणि टोपी यांसंदर्भात निर्बंध असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर महिला उमेदवारांना धार्मिक व पारंपरिक वेशभूषा वापरण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर परीक्षा परिषदेचे अध्यक्ष डॉ. नंदकुमार बेडसे यांनी परिपत्रकाद्वारे सविस्तर भूमिका स्पष्ट केली आहे. विविध राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षांमध्येही चेहरा झाकणाऱ्या वस्तूंवर निर्बंध असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. उमेदवारांची अचूक ओळख निश्चित करणे आणि परीक्षा प्रक्रियेची विश्वासार्हता टिकवून ठेवणे हा यामागील मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अलीकडच्या काळात परीक्षा केंद्रांमध्ये तांत्रिक साधनांचा वापर करून गैरप्रकार करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचेही परिषदेने नमूद केले आहे. मोबाइल फोन लपवून नेणे, प्रश्नपत्रिका बाहेर पाठवणे, बाहेरून उत्तरे प्राप्त करणे तसेच अतिशय लहान आकाराच्या बिनतारी उपकरणांचा वापर करणे यांसारख्या प्रकारांमुळे परीक्षा प्रक्रियेस धोका निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे परीक्षा केंद्रातील प्रत्येक उमेदवाराचा संपूर्ण चेहरा, तोंड, मान आणि कान स्पष्टपणे दिसणे आवश्यक असल्याचे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे. चेहरा झाकलेला असल्यास उमेदवारांमधील संभाषण किंवा इतर संशयास्पद हालचालींची पडताळणी करणे कठीण होते. तसेच ओळख तपासणीच्या वेळी उद्भवू शकणाऱ्या वादांनाही यामुळे आळा बसू शकतो. परिषदेने नुकत्याच घेतलेल्या काही परीक्षांमध्ये दुपट्टा किंवा बुरख्यामध्ये मोबाइल लपवून आणल्याच्या घटना समोर आल्याचेही निदर्शनास आणले आहे. शिक्षक पात्रता परीक्षा ही अत्यंत संवेदनशील परीक्षा मानली जात असल्याने कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित साधने, बिनतारी उपकरणे किंवा इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. या सर्व उपाययोजनांचा उद्देश परीक्षा प्रक्रियेची पारदर्शकता, विश्वासार्हता आणि निष्पक्षता कायम ठेवणे हा असल्याचे डॉ. नंदकुमार बेडसे यांनी स्पष्ट केले आहे.







