मुंबई : ठाणे न्यायालयात आज २००८ मध्ये कल्याण रेल्वे स्थानकावर रेल्वे भरतीवेळी परप्रांतीयांना मनसेने केलेल्या मारहाणीच्या प्रकरणाची आज सुनावणी झाली. या खटल्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासह सात आरोपी न्यायालयात हजर झाले होते. यावेळी राज ठाकरे यांनी म्हटले की, परप्रांतियांना मारहाण हा मुळात गुन्हा नाहीच. हा गुन्हा मी केलेला नाही. हे वाक्य बोलून राज ठाकरे यांनी परप्रांतीयांच्या विरोधात मनसेने केलेले आंदोलन योग्य असल्याचेच राज ठाकरे यांनी ठासून सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी १६ डिसेंबर रोजी होणार आहे.
याप्रकरणी न्या. अभिजित कुलकर्णी यांच्यासमोर सुनावणी झाली. त्यावेळी न्यायालयाने राज ठाकरे यांना गुन्हा कबूल आहे का, असे विचारले. त्यावर गुन्हा कबूल नाही असे राज ठाकरे म्हणाले. त्यावर न्यायालयाने एका महिन्यात प्रकरण संपून जाईल त्यासाठी सहकार्य करा, असे त्यांना सांगितले. त्यावर राज यांनी न्यायालयाला संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे स्पष्ट केले. दीड मिनिटात सुनावणी संपली. यावेळी वकील ओंकार राजूरकर, आदित्य शिरोडकर आणि मंदार लोणारे यांनी ठाकरेंची बाजू मांडली. राज ठाकरे यांना सुनावणीच्या वेळी कोर्टात हजर न राहण्याची मुभा कोर्टाने आज दिली. ठाकरेंच्या वकिलांनी सांगितले की, आरोप निश्चित करण्यासाठी आजची सुनावणी झाली.राज ठाकरेंनी गुन्हा मान्य नसल्याचे सांगितल्याने आता हा खटला पुढे चालवला जाणार आहे.पुढच्या तारखेला साक्षी पुरावे आणि उलटतपासणी होणार आहे. पुढच्या सुनावणीसाठी राज ठाकरेंची उपस्थिती आवश्यक नाही . मात्र जेव्हा न्यायालय सूचना देईल तेव्हा उपस्थित राहणार आहेत.







