रत्नागिरी : गणेशोत्सवासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना कोकणात जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि राज्यातील इतर भागांतून मोठ्या संख्येने चाकरमानी व भाविक कोकणात रवाना होणार आहेत. यामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन परिवहन विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. गणेशोत्सवाच्या काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी १६ टन किंवा त्यापेक्षा अधिक वजनाच्या अवजड वाहनांवर टप्प्याटप्प्याने बंदी लागू करण्यात आली आहे. ट्रक, ट्रेलर तसेच रेती, वाळू आणि इतर जड मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवर हे निर्बंध लागू राहतील. पहिला टप्पा ११ सप्टेंबर रोजी रात्री १२.०१ वाजल्यापासून सुरू होऊन १५ सप्टेंबर रोजी रात्री ११ वाजेपर्यंत लागू असेल. त्यानंतर पाच दिवसांच्या गणपती विसर्जनानिमित्त १८ सप्टेंबर रोजी सकाळी ८ ते रात्री ११ वाजेपर्यंत, गौरी-गणपती विसर्जनासाठी १९ सप्टेंबर सकाळी ८ वाजल्यापासून २० सप्टेंबर रात्री ११ वाजेपर्यंत आणि अनंत चतुर्दशीच्या विसर्जनानंतर २५ सप्टेंबर सकाळी ८ ते २६ सप्टेंबर रात्री ८ वाजेपर्यंत अवजड वाहनांना महामार्गावर प्रवेश बंद राहणार आहे. या निर्णयामुळे गणेशभक्त, एसटी बस आणि खासगी वाहनांचा प्रवास अधिक सुरक्षित व सुरळीत होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मात्र, अत्यावश्यक सेवांवर कोणताही परिणाम होऊ नये यासाठी काही वाहनांना या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. जेएनपीटी आणि जयगड बंदरातून आयात-निर्यात मालाची वाहतूक करणारी वाहने, दूध, पेट्रोल, डिझेल, एलपीजी सिलिंडर, औषधे, लिक्विड ऑक्सिजन, भाजीपाला, अन्नधान्य तसेच इतर नाशवंत वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना बंदी लागू होणार नाही. याशिवाय रुग्णवाहिका, पोलीस, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन आणि इतर अत्यावश्यक सेवांची वाहनेही पूर्ववत सुरू राहतील. स्थानिक वाहतूक परिस्थितीनुसार आवश्यक असल्यास निर्बंधांमध्ये बदल किंवा शिथिलता देण्याचे अधिकार नवी मुंबईचे पोलीस आयुक्त तसेच संबंधित जिल्ह्यांच्या पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवात कोकणाच्या दिशेने प्रवास करणाऱ्या नागरिकांनी प्रवासापूर्वी वाहतूक पोलिसांच्या ताज्या सूचनांची माहिती घेऊनच मार्गस्थ व्हावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. यंदाच्या गणेशोत्सवात लाखो भाविकांचा प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि कोंडीरहित करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.






