मीरा-भाईंदर : येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मीरा-भाईंदर महानगरपालिकेने गणेशमूर्ती विसर्जनासाठी व्यापक नियोजन केले असून, यंदा शहरात एकूण २४ विसर्जन केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यावरणपूरक आणि सुरक्षित विसर्जन प्रक्रियेला प्राधान्य देत ६ फूटांपेक्षा उंच गणेशमूर्तींसाठी ५ नैसर्गिक जलस्रोत, तर ६ फूटांखालील मूर्तींसाठी १९ कृत्रिम तलाव तयार करण्यात येणार आहेत. मोठ्या संख्येने भाविक विसर्जनासाठी येण्याची शक्यता लक्षात घेऊन सर्व ठिकाणी आवश्यक सुविधा, मनुष्यबळ आणि सुरक्षा व्यवस्थेची तयारी पूर्ण करण्यात आली आहे. गेल्या वर्षी शहरात ९९ हजार १६७ गणेशमूर्ती आणि गौरींचे विसर्जन करण्यात आले होते. यंदा ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने नियोजन अधिक मजबूत केले आहे.
६ फूटांखालील मूर्तींच्या विसर्जनासाठी शहरातील विविध भागांत कृत्रिम तलाव उभारण्यात येणार आहेत. यामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस मैदान, एसटीची मोकळी जागा, बाळासाहेब ठाकरे मैदान, मेजर ध्यानचंद मैदान, जेसल पार्क चौपाटी, बालाजी मैदान, डॉन बॉस्को शाळेसमोरील जागा (मीरा रोड), शिवार गार्डन, मोर्चा गावातील पाटील मैदान, रामदेव पार्क परिसर, नगरभवन तलाव, जुना नवघर तलाव, एस. एन. कॉलेजसमोरील मैदान, पद्मावती तलाव, नासका तलाव, जरीमरी तलाव, सातकरी तलाव आणि पेणकरपाडा येथील सुकाळा तलाव यांसारख्या ठिकाणांचा समावेश आहे. तर उत्तन समुद्रकिनारा, भाईंदर पश्चिम खाडी किनारा, भाईंदर पूर्व खाडी किनारा, घोडबंदर येथील रेतीबंदर खाडी किनारा आणि चेना नदी या पाच नैसर्गिक जलस्रोतांमध्ये मोठ्या गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. विसर्जन प्रक्रिया अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध करण्यासाठी महापालिकेने विशेष उपाययोजना आखल्या आहेत. भाविकांना थेट पाण्यात उतरून मूर्ती विसर्जित करण्यास परवानगी दिली जाणार नाही. त्याऐवजी प्रत्येक विसर्जनस्थळी विशेष विसर्जन पथके नियुक्त करण्यात येणार असून, ही पथके सुरक्षितपणे मूर्ती विसर्जित करण्याची जबाबदारी पार पाडतील. संभाव्य अपघात टाळण्यासाठी पोलीस बंदोबस्त, गर्दी नियंत्रणासाठी अतिरिक्त कर्मचारी आणि आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी वैद्यकीय पथके प्रत्येक ठिकाणी तैनात राहणार आहेत. तसेच सर्व विसर्जन केंद्रांवर आवश्यक यंत्रसामग्री, प्रकाश व्यवस्था, स्वच्छता आणि नागरिकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. गणेशोत्सवाच्या काळात लाखो भाविक विसर्जनासाठी एकत्र येत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनाने सर्व संबंधित विभागांमध्ये समन्वय साधला आहे. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्याबरोबरच विसर्जन प्रक्रिया अपघातमुक्त, सुव्यवस्थित आणि नागरिकांसाठी सुलभ व्हावी, हा महापालिकेचा प्रमुख उद्देश आहे. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून अधिकृत विसर्जनस्थळांचाच वापर करावा आणि सुरक्षित व पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.






