मुंबई : प्रमाणापेक्षा अधिक वजनाचे दप्तर वाहणाऱ्या मुलांना पाठदुखीचा त्रास, सांधे आखडणे, स्नायू आखडणे, मणक्याची झीज, मान दुखणे, फुप्फुसांची कार्यक्षमता कमी होणे, थकवा, मानसिक ताण, डोकेदुखी यासारखे आजार होऊ शकतात. पाठीवरचे दप्तर योग्यरित्या न घातल्यास तसेच दप्तरातील वह्या-पुस्तकं तसेच इतर वस्तूंच्या ओझ्यामुळे ६ ते १६ वयोगटातील शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये पाठदुखीची समस्या आढळून येते. पाठदुखीच्या वाढत्या घटना मुलांमध्ये चिंतेचा विषय ठरत आहेत कारण मणक्यावर होणाऱ्या दुष्परिणामांमुळे त्यांच्या दप्तराच्या ओझ्यामुळे मुलांमध्ये आरोग्यविषयक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. भविष्यात मान, पाठीचा कणा इत्यादी व्याधी विद्यार्थ्यांमध्ये बळावू शकतात. दप्तराच्या ओझ्यामुळे विद्यार्थ्यांची उंची वाढण्यास अडथळे निर्माण होत आहेत. वाढत्या ओझ्यामुळे विद्यार्थ्यांची उभे राहण्याची पद्धतच बदलली आहे. किंबहुना या वाढत्या ओझ्यामुळे विद्यार्थ्यांची शारीरिक ठेवण बदलत आहे असे तज्ज्ञांचे मत आहे. पालकांनी हे लक्षात घ्या की आपल्या पाल्याच्या दप्तराचे ओझे हे शरीराच्या वजनाच्या १५ टक्के पेक्षा जास्त नसावे. पाठदुखी ही आता केवळ प्रौढांमधील समस्या राहिलेली नसून शाळेत जाणाऱ्या मुलांमध्येही मोठ्या प्रमाणात दिसून येते. जड बॅकपॅक मुलाच्या पाठीचा कणा, मस्क्यूकोस्केलेटल सिस्टम आणि शारीरीक ठेवण यावर परिणाम करते. त्यामुळे, पाठीचा कणा उलट्या विरुद्ध दिशेस झुकतो. शाळेत जाणाऱ्या १० पैकी ८ मुलांना पाठदुखीचा त्रास उद्भवतो. मुंग्या येणे, हात सुन्न होणे, लाल चट्टे येणे तसेच जड पिशव्यांमुळे शारीरीक स्थितीवर परिणाम होतो ज्यामुळे दैनंदिन कामात व्यत्यय येऊ शकतो. यामुळे मुलं त्यांच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करू शकत नाहीत. जड पिशव्यांमुळे खांदे पाठीच्या वरच्या भागात वक्र होतात ज्यामुळे खांदा आणि मानेच्या वेदना वाढतात. मुलांची बॅग ही पाठदुखी होण्याइतकी जड नसावी, याची पालकांनी खात्री करावी असे लीलावती रुग्णालयाचे अस्थिशल्यविशारद डॉ समीर रुपारेल यांनी सांगितले.