मुंबई : दहशतवाद विरोधी पथकाने राज्यभर राबवलेल्या विशेष मोहिमेत १७ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली. त्यात तीन महिलांचा समावेश आहे. याप्रकरणी ठाणे, नवी मुंबई, मुंबई शहर, नाशिक या ठिकाणी १० गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आरोपींनी बनावट कादपत्रांद्वारे भारतीय आधारकार्ड व पॅनकार्ड तयार केल्याचे निष्पन्न झाले आहे.
दहशतवाद विरोधी पथकाकडून स्थानिक पोलिसांच्या मदतीने महाराष्ट्रात विविध ठिकाणी अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरीकांचा शोध घेण्यासाठी आणि त्यांच्यावर करवाई करण्यासाठी विशेष मोहिम राबवण्यात आली आहे. त्याचाच भाग म्हणून ठाणे, नवी मुंबई, मुंबई शहर, नाशिक इ. शहरांमध्ये अवैधरित्या भारतात प्रवेश केलेल्या बांगलादेशी नागरिकांचा शोध घेण्यात आला. त्यात विविध पोलीस ठाण्यांमध्ये आतापर्यंत एकुण १० गुन्हे परकिय नागरिक कायदा १९४६, पारपत्र (भारतात प्रवेश) कायदा १९५०, पारपत्र अधिनियम १९६७ प्रमाणे दाखल करण्यात आले आहेत. त्यात १४ पुरुष व ३ महिला अशा एकूण १७ अवैधरित्या वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. बांगलादेशी नागरिकांनी बनावट कागदपत्रांचा वापर करून आधारकार्ड, पॅनकार्ड इ. ओळखपत्रेही तयार केली असल्याचे या मोहिमेदरम्यान निदर्शनास आले आहे.