मुंबई : रस्त्याकडेला तसेच नो पार्किंगमध्ये उभे असलेल्या वाहनाला टोइंग करून विविध वाहतूक चौक्याबाहेर ठेवण्यात आले आहे. यांपैकी ३९०१ वाहने दोन ते तीन वर्षांपासून बेवारस अवस्थेत पडून आहे. यातील काही वर्षे आणखी जुनी आहेत. १५ फेब्रुवारीपर्यंत याचे मूळ मालक कागदपत्रांसह न आल्यास ही वाहने लिलावात काढण्यात येणार आहे. त्यामुळे यामध्ये तुमचेही वाहन असल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे. वाहतूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण शाखेच्या विविध चौक्यांमध्ये ३,९०९ बेवारस वाहने जमा झाली आहेत. या वाहनांची सविस्तर यादी मुंबई वाहतूक पोलिसांच्या https://trafficpolicemumbai.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरील बेवारस वाहनामध्ये तसेच मुंबई वाहतूक पोलिसांच्या अधिकृत मोबाइल ऑप्लकेशन मुंबई वाहतूक पोलिस ॲपमध्ये सार्वजनिक सूचना अंतर्गत देण्यात करण्यात आली आहे.
या संकेतस्थळावर तसेच मोबाइल ॲपवर प्रदर्शित केलेल्या वाहनांमध्ये आपले मालकीचे वाहन असल्यास, त्या वाहनांच्या मालकांनी त्यांची दुचाकी, चारचाकी वाहने ताब्यात घेण्यासाठी वरळीतील वाहतूक मुख्यालयातील मल्टीमीडिया सेल वाहतूकच्या पोलिस निरीक्षकांसोबत १५ फेब्रुवारीपूर्वी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
कोणती कागदपत्रे सोबत हवी?
वाहनमालकांनी वाहनाची मूळ कागदपत्रे, स्वतःचे ओळखपत्र, आर. सी. बुक, वाहनचालक परवाना, इत्यादी. कागदपत्रे सोबत घेऊन यावे.
१५ फेब्रुवारीपूर्वी कोणीही पुढे न आल्यास ती वाहने लिलावात काढण्यात येतील. वाहतूक पोलिसांच्या संकेतस्थळावर तसेच ॲपवर माहिती देण्यात आली आहे. या तारखेपर्यंत न आल्यास वाहनांचा लिलाव करण्यात येईल.