वृत्तसंस्था : एकदिवसीय विश्वचषक २०२३ चा ३३वा सामना भारत आणि श्रीलंका यांच्यात २ नोव्हेंबर रोजी वानखेडे स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय संघाने ३०२ धावांच्या मोठ्या फरकाने विजय मिळवला. सामन्यादरम्यान भारतीय फलंदाजांपाठोपाठ भारतीय गोलंदाजही जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याचे दिसून आले. यामुळेच ३५८ धावांच्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ १९.४ षटकात अवघ्या ५५ धावांवर गडगडला. भारताने श्रीलंकेचा ३०२ धावांनी पराभव केला आहे. या विश्वचषकात टीम इंडिया अजिंक्य आहे. भारताने सलग सातवा सामना जिंकून १४ गुणांसह उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले आहे. उपांत्य फेरी गाठणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे. भारताने श्रीलंकेविरुद्ध पुन्हा एकदा एकतर्फी विजय मिळवला आहे. यापूर्वी आशिया चषकाच्या उपांत्य फेरीत भारताने श्रीलंकेला ५० धावांत गुंडाळून सहज विजय मिळवला होता. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत आठ गडी गमावून ३५७ धावा केल्या. शुबमन गिलने सर्वाधिक ९२ धावांची खेळी खेळली. तर विराट कोहलीने ८८ आणि श्रेयस अय्यरने ८२ धावा केल्या. श्रीलंकेकडून दिलशान मदुशंकाने पाच बळी घेतले. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा संघ केवळ ५५ धावा करू शकला. कसून राजिताने सर्वाधिक १४ धावा केल्या. त्यांच्याशिवाय महिष तिक्षिना आणि अँजेलो मॅथ्यूजने प्रत्येकी १२ धावा केल्या. श्रीलंकेचे पाच फलंदाज शून्य धावांवर बाद झाले. त्याचवेळी आठ फलंदाजांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. भारताकडून मोहम्मद शमीने पाच विकेट घेतल्या. तो या सामन्याचा सामनावीर ठरला. मोहम्मद सिराजने तीन तर जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजाने प्रत्येकी एक विकेट घेतली.