मुंबई : राज्यातील शालेय शिक्षण अधिक सक्षम, आधुनिक आणि तंत्रज्ञानाधारित करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत शालेय शिक्षण विभाग आणि गुगल फॉर एज्युकेशन यांच्यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता प्रशिक्षणासाठी सामंजस्य करार करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील चार लाखांहून अधिक शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल तंत्रज्ञानासंबंधी प्रगत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत या उद्देशपत्रावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. गुगल फॉर एज्युकेशनच्या वतीने विभागाचे उपाध्यक्ष ख्रिस फिलिप्स, तर शालेय शिक्षण विभागाच्या वतीने सहसचिव श्री. ताशीलदार यांनी करारावर स्वाक्षरी केली. या उपक्रमांतर्गत टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण राबविण्यात येणार असून सुरुवातीला निवडक मार्गदर्शक शिक्षकांना विशेष प्रशिक्षण दिले जाईल. त्यानंतर हे प्रशिक्षित शिक्षक राज्यभरातील इतर शिक्षकांना मार्गदर्शन करतील. त्यामुळे राज्यातील प्रत्येक शाळेपर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता आणि आधुनिक डिजिटल साधनांचे प्रशिक्षण पोहोचविण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले की, बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षकांना आधुनिक कौशल्यांनी सुसज्ज करणे ही काळाची गरज आहे. शिक्षकांचे ज्ञान आणि कौशल्ये वाढल्यास विद्यार्थ्यांपर्यंतही आधुनिक शिक्षण प्रभावीपणे पोहोचेल. विशेष म्हणजे या संपूर्ण उपक्रमासाठी राज्य शासनावर कोणताही आर्थिक भार पडणार नसून प्रशिक्षणाची संपूर्ण व्यवस्था गुगलमार्फत विनामूल्य उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच शिक्षकांच्या डिजिटल सुरक्षिततेबाबत विशेष काळजी घेण्यात आली असून संपूर्ण प्रक्रियेवर महाराष्ट्र शासनाचे नियंत्रण राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितले की, शिक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत असून शिक्षकांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे. शासकीय तसेच अनुदानित शाळांतील शिक्षकांना अत्याधुनिक ज्ञान आणि कौशल्ये प्राप्त व्हावीत, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. या सहकार्यामुळे शिक्षकांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता साक्षरता वाढविणे, डिजिटल कौशल्यांचा विकास करणे आणि आधुनिक अध्यापन पद्धतींचा प्रसार करणे शक्य होणार आहे. प्रशिक्षणासाठी मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये स्थानिक गरजांनुसार तयार करण्यात आलेली अभ्याससामग्री उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याशिवाय शिक्षकांना सुरक्षित डिजिटल ओळख प्रदान करणे, आधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांचा शैक्षणिक वापर करण्यास प्रोत्साहन देणे आणि त्यांच्या व्यावसायिक विकासाला चालना देणे यावरही भर दिला जाणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाशी सुसंगत असलेल्या या उपक्रमामुळे तंत्रज्ञानाधारित शिक्षणाला मोठी चालना मिळणार आहे. तसेच माहिती व दळणवळण तंत्रज्ञान प्रयोगशाळा, जोडलेल्या वर्गखोल्या, स्मार्ट वर्गखोल्या, डिजिटल ग्रंथालये आणि भाषा प्रयोगशाळा यांसारख्या आधुनिक शैक्षणिक सुविधांना बळकटी मिळणार आहे. राज्यातील लाखो शिक्षकांना नव्या युगातील कौशल्यांचे प्रशिक्षण देत शिक्षण व्यवस्थेला अधिक सक्षम, परिणामकारक आणि भविष्योन्मुख बनविण्याच्या दृष्टीने हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. यामुळे शिक्षकांसह विद्यार्थ्यांनाही आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळणार असून शिक्षण क्षेत्रात नव्या संधी निर्माण होण्यास मदत होणार आहे.







