पुणे : पुण्याचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभव मानल्या जाणाऱ्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. राज्य सरकारने या ऐतिहासिक आणि लोकप्रिय गणपती संस्थानाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा अधिकृत दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे पुण्यातील धार्मिक पर्यटनाला नवी दिशा मिळणार असून मंदिर परिसराच्या विकासाला मोठी गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वरून या निर्णयाची अधिकृत घोषणा करत आनंद व्यक्त केला. “॥ गणपती बाप्पा मोरयाऽऽऽ ॥ पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती संस्थानाला ‘अ’ वर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे परिसराचा तीर्थक्षेत्र आणि पर्यटनाच्या दृष्टीने सर्वांगीण विकास करणे अधिक सोपे होणार आहे,” असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. या निर्णयासाठी गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. अखेर यश मिळाल्याने पुणेकर आणि गणेशभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या नव्या दर्जामुळे मंदिर परिसराचा शासकीय निधीतून व्यापक विकास होणार आहे. भाविकांसाठी अधिक चांगल्या सुविधा, आधुनिक सुरक्षा व्यवस्था आणि वाहतूक नियोजनावर विशेष भर दिला जाणार आहे. गणेशोत्सव काळात होणारी मोठी गर्दी लक्षात घेऊन पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यात येणार असून, देश-विदेशातील पर्यटक आणि गणेशभक्तांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या निर्णयाचा सकारात्मक परिणाम पुण्यातील स्थानिक बाजारपेठ, हॉटेल व्यवसाय, वाहतूक सेवा आणि रोजगाराच्या संधींवरही होणार आहे. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही या निर्णयाचे स्वागत करत आनंद व्यक्त केला. “दगडूशेठ गणपती संस्थानाला ‘अ’ दर्जा मिळणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे. यामुळे पुण्याच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेला अधिक समृद्धी लाभेल आणि भाविकांसाठी उत्तम सुविधा निर्माण करण्यास मदत होईल,” असे त्या म्हणाल्या.







