मुंबई : करोनानंतर वाढवलेली बससेवा, स्वस्त दरातील एसी बसला वाढता प्रतिसाद आणि अत्याधुनिक तिकीट यंत्रणांमुळे प्रवाशांनी बेस्टला सर्वाधिक पसंती दिली आहे. बेस्टची दररोजची प्रवासी संख्या ३५ लाख झाली आहे. करोनानंतर तब्बल ५५ टक्क्यांनी प्रवासी वाढल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली. वाढत्या प्रतिसादामुळे मुंबईतील दररोजच्या तीन लाख खासगी वाहनांच्या फेऱ्यांची संख्या कमी झाल्याचा दावा बेस्ट उपक्रमाने केला आहे. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रेल्वे बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंबईतील बेस्ट बससेवा अत्यावश्यक सेवा म्हणून धावली. त्यावेळी केवळ मुंबईतील मोजक्याच मार्गावर बससेवा होत्या. करोनाकाळात दररोजची सरासरी २२ लाख ५० हजार असलेली प्रवासीसंख्या आता ३५ लाखांपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे प्रवासीसंख्येत ५५ टक्क्यांनी वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. बेस्ट उपक्रमाचे दररोजचे उत्पन्न हे ४० टक्क्यांपर्यंत म्हणजेच १ कोटी ६४ लाख होते. हेच उत्पन्नही २ कोटी ३० लाखांपर्यंत पोहोचल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली. सध्या बेस्टच्या साध्या बसचे पाच किलोमीटरपर्यंत पाच रूपये आणि एसी बसचे सहा रूपये तिकीट आहे. हा प्रवास स्वस्तात असल्याने करोनानंतर पुन्हा एकदा बेस्टकडे प्रवासी वळते झाले आहेत. अधिकाधिक प्रवाशांपर्यंत बेस्ट पोहोचावी, यासाठी उपक्रमाकडून बसचा ताफाही वाढवण्यावर भर दिला जात आहे. सध्या बेस्टच्या ताफ्यात ३ हजार २१९ बसगाड्या असून या वर्षाअखेर हाच ताफा सात हजारपर्यंत आणि २०२६पर्यंत दहा हजारपर्यंत वाढवण्यात येणार असून या इलेक्ट्रीक बसगाड्या असल्याचे सांगण्यात आले.
बेस्ट उपक्रमाने प्रवाशांसाठी चलो ॲप, कॉमन मोबिलिटी कार्ड, टॅप इन टॅप आऊटची डिजिटल तिकीट सुविधा उपलब्ध केली आहे. चलो अॅपद्वारे मोबाइल तिकीट, बसपास, बसगाडीची सद्यस्थिती इत्यादी माहिती प्रवाशाला उपलब्ध होत आहे. रोज तीनपैकी एका प्रवाशाकडून या ॲपचा वापर करण्यात येत आहे. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे सांगितले. तसेच प्रवाशांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड, बेस्ट बसमध्ये टॅप इन टॅप आऊटद्वारे प्रवासी स्वत:च्या कार्डचा वापर करून तिकीटही काढू शकतात. अशा सुविधांमुळे झटपट प्रवासासाठी प्रवासी बेस्टची निवड करत असल्याचे सांगितले.
२२ टक्के दैनंदिन तिकीटे यापूर्वीच डिजीटल तिकिटांमध्ये रूपांतरित करण्यात आली आहेत. यामुळे पेपर रोलच्या खर्चाची वार्षिक १ कोटी ९९ लाख रुपयांची बचत झाली आहे. वाढत्या प्रतिसादामुळे रोजच्या ३ लाख १२ हजार खासगी वाहनांच्या फेऱ्या कमी झाल्या आहे. परिणामी इंधनाचा वापर, हवा आणि ध्वनिप्रदूषणात प्रचंड प्रमाणात घट झाल्याचा दावा बेस्ट उपक्रमाने केला आहे. परिवहन विभाग आणि बेस्ट उपक्रमाने गोळा केलेल्या माहितीतून ही बाब समोर आली आहे.





