मुंबई : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. ११ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत गणेशभक्तांच्या वाहनांना टोलमाफी देण्यात येणार आहे. यंदाच्या निर्णयातील सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी शिवडी-न्हावा शेवा अटल सेतूचाही या टोलमाफी योजनेत प्रथमच समावेश करण्यात आला आहे. दरवर्षी गणेशोत्सवासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे तसेच राज्याच्या विविध भागांतून लाखो नागरिक कोकणात आपल्या गावी जातात. या वाढत्या प्रवासाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने प्रमुख मार्गांवरील टोलमाफी जाहीर केली आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६, मुंबई-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारीतील संबंधित टोलनाक्यांवर ही सवलत लागू राहणार आहे. टोलमाफीचा लाभ घेण्यासाठी वाहनांवर ‘गणेशोत्सव २०२६ कोकण दर्शन’ असा विशेष पास किंवा स्टिकर लावणे बंधनकारक असणार आहे. या पासवर वाहन क्रमांक आणि चालकाचे नाव नमूद केले जाईल. संबंधित पास पोलीस ठाणे, वाहतूक पोलीस चौक्या आणि प्रादेशिक परिवहन कार्यालयांमार्फत उपलब्ध करून दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे कोकणात जाताना घेतलेला हा पास परतीच्या प्रवासासाठीही वैध राहणार असल्याने गणेशोत्सवानंतर मुंबईकडे परतताना स्वतंत्र पास घेण्याची आवश्यकता भासणार नाही.
राज्य सरकारच्या या निर्णयाचा लाभ केवळ खासगी वाहनधारकांनाच नव्हे, तर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसनाही मिळणार आहे. त्यामुळे एसटीने प्रवास करणाऱ्या गणेशभक्तांनाही टोलमाफीचा फायदा होईल. गणेशोत्सवाच्या काळात मुंबई-गोवा महामार्ग आणि कोकणातील प्रमुख मार्गांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढत असल्याने यंदाही प्रशासनासमोर वाहतूक व्यवस्थापनाचे मोठे आव्हान असणार आहे. टोलनाक्यांवर अनावश्यक गर्दी होऊ नये, वाहतूक सुरळीत राहावी आणि गणेशभक्तांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यंदा १४ सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी असल्यामुळे त्यापूर्वीच ११ सप्टेंबरपासून टोलमाफी लागू करण्यात येणार आहे, जेणेकरून मोठ्या प्रमाणात कोकणाकडे रवाना होणाऱ्या भाविकांना त्याचा लाभ घेता येईल. या निर्णयामुळे प्रवासाचा खर्च कमी होण्याबरोबरच टोलनाक्यांवरील वेळेची बचत होणार असून गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाचे कोकणवासीय आणि गणेशभक्तांकडून स्वागत करण्यात येत असून, यंदाचा गणेशोत्सव अधिक सुखकर आणि सुलभ करण्याच्या दृष्टीने हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.






