मुंबई : मुंबईच्या जुहू येथील इस्कॉन (ISKCON) मंदिर परिसरातील तीन अन्न आस्थापनांवर अन्न व औषध प्रशासनाने (FDA) मोठी कारवाई करत त्यांचे अन्न व्यवसाय परवाने तात्काळ निलंबित केले आहेत. ३ सप्टेंबर २०२६ रोजी एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांनी ‘हरे कृष्णा लँड’ परिसरातील खाद्य प्रतिष्ठानांची अचानक तपासणी केली. या तपासणीदरम्यान अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांचे गंभीर उल्लंघन झाल्याचे उघड झाले. कारवाई करण्यात आलेल्या आस्थापनांमध्ये इस्कॉन फूड सर्व्हिसेस रेस्टॉरंट, इस्कॉन रेस्टॉरंट आणि गोविंददास रेस्टॉरंट यांचा समावेश आहे. तपासणीदरम्यान किचन, फूड हँडलिंग विभाग आणि स्टोअर रूममध्ये मोठ्या प्रमाणात कीटक व झुरळांचा प्रादुर्भाव आढळला. तसेच कीटक नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या नसल्याचेही निदर्शनास आले. स्वयंपाकघरातील गटारे अन्नकचऱ्यामुळे तुंबलेली होती, तर कोल्ड स्टोरेज विभागाजवळ सांडपाणी साचल्यामुळे अस्वच्छ वातावरण निर्माण झाले होते. याशिवाय कच्चे आणि शिजवलेले अन्नपदार्थ वेगवेगळे न ठेवता एकत्र साठवण्यात आल्याचे आढळून आले, त्यामुळे अन्न दूषित होण्याचा म्हणजेच ‘क्रॉस-कंटॅमिनेशन’चा गंभीर धोका निर्माण झाल्याचे अधिकाऱ्यांनी नमूद केले. अन्न साठवणूक, स्वच्छता आणि सुरक्षित अन्न हाताळणीच्या मूलभूत नियमांचे पालन न झाल्याने ग्राहकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असल्याचे एफडीएने स्पष्ट केले आहे.
तपासणीदरम्यान आवश्यक कागदपत्रांमध्येही अनेक त्रुटी आढळल्या. अन्नपदार्थ आणि पिण्याच्या पाण्याच्या नियमित प्रयोगशाळा चाचण्यांचे अहवाल उपलब्ध नव्हते. तसेच अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी, फिटनेस प्रमाणपत्रे आणि संबंधित नोंदीही सादर करण्यात आल्या नव्हत्या. काही कर्मचारी मास्क, ॲप्रन आणि हातमोजे न घालता थेट अन्न हाताळत असल्याचेही अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले. या सर्व बाबी अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाच्या नियमांचे गंभीर उल्लंघन मानून एफडीएने तिन्ही आस्थापनांचे परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित केले. अधिकृत माहितीनुसार, संबंधित सर्व त्रुटी पूर्णपणे दूर करून आवश्यक सुधारणा झाल्याची खात्री होईपर्यंत ही रेस्टॉरंट्स सुरू करण्यास परवानगी दिली जाणार नाही. दरम्यान, इस्कॉन प्रशासनाने या कारवाईवर प्रतिक्रिया देताना तपासणीत निदर्शनास आलेल्या सुमारे ७० टक्के त्रुटींची पूर्तता करण्यात आल्याचा दावा केला आहे. उर्वरित सुधारणा एफडीएच्या मानकांनुसार युद्धपातळीवर सुरू असून सर्व आवश्यक नियमांचे पालन करून लवकरात लवकर सेवा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि ग्राहकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून एफडीएने दिला असून, राज्यभरातील सर्व खाद्य आस्थापनांनी अन्न सुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करावे, अन्यथा अशाच प्रकारची कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.






