छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण भागातील सरकारी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी कॉक्रोच जनता पार्टी (CJP)ने सुरू केलेल्या ‘स्कूल ठीक करो’ अभियानाला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. पक्षाचे प्रमुख अभिजीत दिपके यांनी काही दिवसांपूर्वी ग्रामीण शाळांमधील मूलभूत सुविधांचा अभाव, विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या अडचणी आणि शिक्षण व्यवस्थेतील त्रुटी समाजासमोर आणण्याची घोषणा केली होती. त्यानंतर राज्यातील विविध भागांतून नागरिक आणि विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असल्याची माहिती त्यांनी समाजमाध्यमांवर दिली. यासंदर्भात त्यांनी दोन व्हिडिओ प्रसिद्ध करून ग्रामीण शिक्षण व्यवस्थेतील समस्यांकडे लक्ष वेधले आहे. या व्हिडिओंमध्ये विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी येणाऱ्या अडचणी, अपुऱ्या सुविधा आणि स्थानिक पातळीवरील समस्या दाखवण्यात आल्या असून, त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. दिल्लीतील नीट (NEET) परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी आंदोलनानंतर आता ग्रामीण शिक्षणाच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय पक्षाने घेतला असून, सर्वसामान्य नागरिकांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
अभियानाची घोषणा होताच राज्यातील विविध जिल्ह्यांतून विद्यार्थ्यांनी आपल्या शाळांची परिस्थिती दर्शवणारे व्हिडिओ पाठवण्यास सुरुवात केली आहे. नागपूर ग्रामीणमधील खेतापूर येथील विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था दाखवणारा व्हिडिओ पाठवला, तर नाशिक जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी वृत्तवाहिनीच्या रिपोर्टिंगच्या धर्तीवर शाळेतील समस्यांचे सादरीकरण करणारा व्हिडिओ तयार करून पाठवला आहे. या प्रतिसादामुळे पुढील काही दिवसांत आणखी मोठ्या प्रमाणावर माहिती समोर येईल, असा विश्वास अभिजीत दिपके यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्याला ८० वर्षे पूर्ण होत असतानाही ग्रामीण भागातील सरकारी शाळांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव कायम असल्याबद्दल खंत व्यक्त केली. मंत्री, खासदार आणि आमदारांची निवासस्थाने व कार्यालये उभारली जातात, मात्र गावांतील शाळांकडे दुर्लक्ष का केले जाते, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. “ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आजही मूलभूत सुविधांसाठी विनवण्या कराव्या लागत असतील, तर ती संपूर्ण व्यवस्थेची अपयशाची बाब आहे. याच पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यदिनापासून ‘स्कूल ठीक करो’ अभियान सुरू करून सरकारी शाळांमध्ये सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे,” असे अभिजीत दिपके यांनी स्पष्ट केले.






