विरार : शहरातील सर्व मतदान केंद्रांवर शनिवार आणि रविवारी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) पूर्णवेळ उपस्थित राहणार आहेत. नागरिकांना प्रगणक अर्ज वेळेत भरून सादर करता यावा, या उद्देशाने ही विशेष व्यवस्था करण्यात आली असून, या दोन दिवसांचा लाभ घेऊन संबंधित मतदारांनी आपले अर्ज भरून बीएलओंकडे जमा करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी केले आहे. राज्यभर मतदार याद्यांच्या शुद्धीकरणासाठी विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम सुरू असून, जुलै महिन्यातील पूरपरिस्थितीमुळे पालघर जिल्ह्यात या प्रक्रियेचा वेग काहीसा मंदावला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वी दिलेल्या माहितीनुसार, पूरस्थितीमुळे जिल्ह्यात केवळ ४५ टक्के मॅपिंग पूर्ण झाले होते. तसेच निमशहरी भागातील वसई, नालासोपारा आणि बोईसर मतदारसंघांमध्ये ग्रामीण भागाच्या तुलनेत प्रगणक अर्ज संकलन आणि नोंदणीचे प्रमाण कमी असल्याचेही स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे वाढीव मुदतीत ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने विशेष प्रयत्न सुरू केले आहेत.
मुख्य राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरील आकडेवारीनुसार, पालघर जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत २३ लाख १४ हजार ३४७ म्हणजेच ९७.७ टक्के प्रगणक अर्जांचे वाटप पूर्ण झाले असून, त्यापैकी १५ लाख ८८ हजार ७२७ अर्जांतील माहिती संगणकीकृत करण्यात आली आहे. हे प्रमाण ६६.८६ टक्के इतके आहे. उर्वरित प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी यासाठी वसई-विरार महानगरपालिका प्रशासनाने शनिवार आणि रविवारी सर्व मतदान केंद्रांवर बीएलओ पूर्णवेळ उपलब्ध राहतील, अशी व्यवस्था केली आहे. ज्या मतदारांना अद्याप प्रगणक अर्ज मिळालेला नाही, त्यांनी संबंधित मतदान केंद्रावर जाऊन अर्ज प्राप्त करून तो त्याच दिवशी अचूक माहिती भरून बीएलओंकडे जमा करावा, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. तसेच ज्यांच्याकडे अर्ज असूनही तो अद्याप सादर केलेला नाही, अशा मतदारांनीही या विशेष सुविधेचा लाभ घेऊन संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे अर्ज जमा करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांनी केले आहे. प्रशासनाच्या या विशेष उपक्रमामुळे एसआयआर प्रक्रिया वेगाने पूर्ण होण्यास मदत होणार असून, मतदार याद्या अधिक अचूक आणि अद्ययावत करण्याचे उद्दिष्ट साध्य होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.






