मुंबई : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अधिकृत ई-मेल खात्यावर पुन्हा एकदा बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल आल्याने मुंबईत खळबळ उडाली आहे. या ई-मेलमध्ये महापौर कार्यालयासह मुंबई मेट्रो, शाळा आणि शेअर बाजाराला लक्ष्य करण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच १५ ऑगस्टपूर्वी हल्ला केला जाईल, असा दावाही ई-मेलमध्ये करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या संदेशात काही खलिस्तान समर्थक घोषणा तसेच काही व्यक्तींची नावे नमूद करण्यात आल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांकडून या धमकीकडे गांभीर्याने पाहिले जात आहे. ई-मेलमध्ये नागरिकांना आपल्या मुलांना शाळेत पाठवू नये तसेच मेट्रोने प्रवास करू नये, असा इशाराही देण्यात आल्याचे सांगण्यात येते. महापौर रितू तावडे यांना यापूर्वीही दोन वेळा अशाच प्रकारचे धमकीचे ई-मेल प्राप्त झाल्याची माहिती आहे. त्यामुळे पुन्हा आलेल्या या ई-मेलनंतर मुंबई पोलीस आणि सायबर पोलीस अधिक सतर्क झाले असून, संबंधित यंत्रणांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू असून, धमकीचा ई-मेल कोणत्या IP Address वरून पाठवण्यात आला, त्याचा मूळ स्रोत कोणता आहे आणि हा संदेश नेमका कोणी पाठवला, याचा शोध घेण्यात येत आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील महत्त्वाच्या ठिकाणांची सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली जाण्याची शक्यता आहे. तपास यंत्रणांकडून ई-मेलमधील प्रत्येक माहितीची पडताळणी केली जात असून, धमकी प्रत्यक्षात कितपत गंभीर आहे, याचाही तपास केला जात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत यंत्रणांकडून मिळणाऱ्या माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी महापौर बंगल्याच्या दुरुस्तीच्या खर्चावरून सुरू असलेल्या वादावरही स्पष्टीकरण दिले आहे. महापौर बंगल्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात असल्याचा दावा चुकीचा असून, चर्चेत असलेल्या निविदेचा महापौर बंगल्याशी कोणताही संबंध नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. संबंधित काम राणी बागेतील असल्याचे सांगत विरोधकांकडून या विषयावर दिशाभूल करणारा ‘फेक नरेटिव्ह’ तयार केला जात असल्याचा आरोप तावडे यांनी केला. महापौर नाव जोडल्यास राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. महापौर बंगला हा हेरिटेज इमारतीच्या श्रेणीत येत असल्याने त्याच्याशी संबंधित कोणतीही निविदा प्रक्रिया स्वतंत्र पद्धतीने केली जाते, असे त्यांनी स्पष्ट केले. सध्या चर्चेत असलेली २ कोटी ८९ लाख रुपयांची निविदा ही राणी बाग अर्थात वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व प्राणिसंग्रहालयाच्या उद्यान विभागाने काढलेली असून, तिचा महापौर बंगल्याशी कोणताही संबंध नसल्याचा दावा त्यांनी केला. त्यामुळे महापौरांच्या सुरक्षेबाबत आलेल्या धमकीच्या ई-मेलनंतर सुरू असलेल्या तपासासोबतच महापौर बंगल्याच्या निविदेवरून सुरू असलेला राजकीय वादही चर्चेत आला आहे. रितू तावडे या घाटकोपरमधील प्रभाग क्रमांक १३२ मधून सलग दुसऱ्यांदा नगरसेविका म्हणून निवडून आल्याचे सांगण्यात येते. महापालिकेतील अभ्यासू आणि आक्रमक नगरसेविका अशी त्यांची ओळख असून, सध्या त्या मुंबईच्या महापौरपदाची जबाबदारी सांभाळत आहेत.






