मुंबई : राज्यात नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, पूर, वीज पडणे, भूस्खलन आणि इतर दुर्घटनांमुळे होणारी जीवितहानी टाळण्यासाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने जानेवारी २०२६ पासून आतापर्यंत एकूण १,६९८ अलर्ट जारी केले आहेत. याशिवाय वीज पडणे, अतिवृष्टी आणि भूस्खलनासंदर्भातील २८५ विशेष इशारे स्थानिक प्रशासन आणि नागरिकांना देण्यात आले असल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे. हवामान खात्याकडून मिळणाऱ्या पूर्वसूचना आणि रिअल-टाइम अलर्टच्या आधारे जिल्हा प्रशासनाला तात्काळ सूचना देऊन आवश्यक उपाययोजना राबविण्यात आल्या. आपत्कालीन परिस्थितीचा प्रभावी सामना करण्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) यांची एकूण २३ पथके राज्यातील संवेदनशील भागांत तैनात करण्यात आली आहेत. त्यामध्ये एनडीआरएफची १७ आणि एसडीआरएफची ६ पथके कार्यरत असून, आपत्तीच्या वेळी त्वरित बचाव आणि मदतकार्य करण्यात येत आहे. मुंबईत सर्वाधिक चार एनडीआरएफ पथके तैनात असून पालघर, नागपूर, पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर येथेही आवश्यकतेनुसार पथके नियुक्त करण्यात आली आहेत. एसडीआरएफची पथके धुळे, नागपूर, नांदेड आणि गडचिरोली येथे कार्यरत असून जिल्हा प्रशासन, आपत्ती प्रतिसाद दल आणि स्थानिक यंत्रणांमध्ये समन्वय ठेवून शासनाने आवश्यक उपाययोजना केल्या आहेत.
राज्यात जून आणि जुलै महिन्यांत वीज पडणे, भिंत कोसळणे, झाड पडणे, पुराच्या पाण्यात वाहून जाणे आणि दरड कोसळणे अशा घटनांमुळे ८४ जणांचा मृत्यू झाला आहे. तरीही यंदाच्या पावसाळ्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस होऊनही विविध जिल्ह्यांमध्ये वेळेवर करण्यात आलेल्या बचाव आणि मदतकार्यामुळे मोठ्या प्रमाणावरील जीवित आणि पशुधनाची हानी टळल्याचे विभागाने नमूद केले आहे. जानेवारी ते जुलै २०२६ या कालावधीत विविध दुर्घटनांमध्ये एकूण १३७ नागरिकांचा आणि ५०५ पशुधनाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. पालघर, पुणे, ठाणे, रायगड, नागपूर, सिंधुदुर्ग, गडचिरोली, भंडारा आदी जिल्ह्यांतील पूरस्थितीत एसडीआरएफ, जिल्हा प्रशासन आणि स्थानिक यंत्रणांनी तातडीने बचावकार्य करून अनेक नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले. दरम्यान, भारतीय हवामान विभागाच्या ७ ऑगस्ट २०२६ पर्यंतच्या अंदाजानुसार राज्यातील विविध भागांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. विदर्भात विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि पावसाचा अंदाज असून मुंबई महानगर, कोकण, घाट विभाग, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातही पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करावे, विजांच्या कडकडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी थांबावे, पूरप्रवण आणि धोकादायक भागात जाणे टाळावे तसेच धरणांमधून होणाऱ्या विसर्गासंदर्भातील स्थानिक प्रशासनाच्या इशाऱ्यांकडे विशेष लक्ष द्यावे, असे आवाहन राज्य आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेने केले आहे.






