मुंबई : महसूल विभागाच्या सेवा आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान’मुळे नागरिकांच्या तक्रारी आणि अर्जांवर तातडीने व समाधानकारक कार्यवाही होत असल्याचे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले. मुंबई शहर जिल्ह्यात २२ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत प्रत्येक विधानसभा मतदारसंघात हे अभियान राबविण्यात आले असून, अंतिम शिबिर कुलाबा विधानसभा मतदारसंघातील के. सी. महाविद्यालयाच्या रामा आणि सुंदरी वाटूमल सभागृहात पार पडले. यावेळी बोलताना नार्वेकर यांनी सांगितले की, ‘शासन आपल्या दारी’ या संकल्पनेला अधिक प्रभावी स्वरूप देत नागरिकांना केवळ सेवा उपलब्ध करून देणे नव्हे, तर त्यांच्या अडचणींचे समाधान करणे हे या अभियानाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या न्याय, हक्क आणि लोककल्याणाच्या विचारांवर आधारित सक्षम महसूल व्यवस्था उभारण्याचा शासनाचा प्रयत्न असून महसूल विभागाचा नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी थेट संबंध आहे. मालमत्ता नोंदणी, विविध दाखले, नैसर्गिक आपत्तीच्या काळातील पंचनामे तसेच इतर अनेक महत्त्वाच्या सेवांमध्ये महसूल विभागाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी नमूद केले. कुलाबा मतदारसंघात विविध आर्थिक स्तरातील नागरिक वास्तव्यास असल्याने प्रत्येकाला शासनाच्या सेवा पारदर्शक, सुलभ आणि वेळेत मिळणे आवश्यक आहे. या शिबिरांमुळे नागरिकांचा वेळ वाचत असून अनेक शासकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध होत आहेत. विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करताना लोकाभिमुख आणि सक्षम महसूल व्यवस्था महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या अभियानाबाबत माहिती देताना मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी सांगितले की, २२ जुलै ते २ ऑगस्टदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या समाधान शिबिरांद्वारे सुमारे एक लाख नागरिकांपर्यंत शासनाच्या सेवा पोहोचल्या. महसूल दिनानिमित्त झालेल्या अंतिम शिबिरात विविध शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. एप्रिल ते जून २०२६ या कालावधीत मुंबई शहर जिल्ह्यात सुमारे साडेसात लाख विविध प्रकारचे दाखले वितरित करण्यात आले. तसेच मागील आर्थिक वर्षात ४९० कोटी रुपयांच्या महसूल वसुलीच्या उद्दिष्टाच्या तुलनेत तब्बल ७७९ कोटी रुपयांची वसुली करून १६० टक्के कामगिरी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. महसूल विभागाच्या कामकाजात संगणकीकरणावर विशेष भर देण्यात आला असून प्रशासन अधिक पारदर्शक, गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांना कार्यालयांमध्ये वारंवार येण्याची गरज भासू नये आणि आवश्यक सेवा सुलभपणे मिळाव्यात, यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. यावेळी मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या स्थापनेच्या शताब्दी वर्षानिमित्त विशेष टपाल आवरणाचे अनावरण करण्यात आले. भारतीय टपाल विभागाच्या जीपीओ निर्देशक रेखा रिजवी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या शंभर वर्षांच्या लोकाभिमुख प्रशासनाचा गौरव करत हे विशेष आवरण आणि स्मरण टपाल तिकीट पुढील पिढ्यांसाठी ऐतिहासिक ठेवा ठरेल, असे सांगितले. गेल्या शतकभरात महसूल प्रशासन, विविध शासकीय सेवा, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन आणि शासनाच्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीत मुंबई शहर जिल्हाधिकारी कार्यालयाने बजावलेली भूमिका उल्लेखनीय असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.






