मुंबई : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्र शासनाच्या ‘ड्रग फ्री मुंबई’ अभियानाचे स्वागत करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष अभिनंदन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला असून, हे अभियान नशामुक्त, जागरूक आणि सशक्त समाजाच्या निर्मितीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या संदेशात नमूद केले आहे. त्यांनी म्हटले की, नशा ही समाजाच्या आरोग्य, सुरक्षितता, शांतता आणि विकासासमोरील गंभीर समस्या असून, तिचा व्यक्तीच्या निर्णयक्षमतेवर, आत्मविश्वासावर आणि जीवनाच्या दिशेवर प्रतिकूल परिणाम होतो. विशेषतः मादक पदार्थांचे व्यसन हे तरुणांच्या भविष्याला, त्यांच्या प्रतिभेला आणि संधींना मोठा धोका निर्माण करणारे आहे. त्यामुळे नशामुक्त समाज उभारण्यासाठी केवळ कायद्याची अंमलबजावणी पुरेशी नसून जनजागृती, कुटुंबातील संस्कार, समाजाची सामूहिक जबाबदारी आणि विविध संस्थांचे समन्वित प्रयत्न आवश्यक असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. विकसित भारताच्या निर्मितीत युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे सांगताना प्रधानमंत्री मोदी यांनी युवकांची स्वप्ने, संकल्प, ऊर्जा आणि सकारात्मक विचारसरणी ही देशाची सर्वात मोठी ताकद असल्याचे नमूद केले. तरुणांनी शिस्त, आत्मविश्वास आणि निरोगी जीवनमूल्ये स्वीकारल्यास ते स्वतःच्या प्रगतीबरोबरच राष्ट्राच्या सर्वांगीण विकासातही मोलाचे योगदान देऊ शकतात, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रधानमंत्री मोदी यांनी पुढे सांगितले की, ‘नशामुक्त भारत’ या राष्ट्रीय संकल्पाच्या पूर्ततेसाठी देशभरात जनजागृती, जनसहभाग, समुपदेशन सेवा आणि पुनर्वसन यांसारखे विविध उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहेत. गेल्या काही वर्षांत ‘नशामुक्त भारत अभियान’ हे व्यापक जनआंदोलन बनले असून, विद्यार्थी, युवक, सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संघटनांचा त्यात मोठ्या प्रमाणावर सहभाग वाढत आहे. मुंबईतील ऊर्जावान युवकांची स्वप्ने आणि आकांक्षा या भारताच्या विकासाशी थेट निगडित असल्याचे नमूद करत त्यांनी महाराष्ट्र शासनाने सुरू केलेले ‘ड्रग फ्री मुंबई’ अभियान युवकांना योग्य दिशा आणि सकारात्मक वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास व्यक्त केला. या अभियानाच्या शुभारंभप्रसंगी हजारो विद्यार्थी प्रत्यक्ष उपस्थित राहून तसेच लाखो युवक ऑनलाइन माध्यमातून नशामुक्त जीवनाची शपथ घेत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. जनजागृती हेच व्यसनाविरुद्धचे सर्वात प्रभावी संरक्षण असल्याचे सांगत त्यांनी युवकांना योग्य मार्गदर्शन आणि सकारात्मक प्रेरणा देणारे असे उपक्रम समाजात व्यापक परिवर्तन घडवू शकतात, असे नमूद केले. ‘ड्रग फ्री मुंबई’ अभियानामुळे ‘नशामुक्त भारत’ या राष्ट्रीय संकल्पाला अधिक गती मिळेल आणि देशातील युवकांचे उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त करत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अभियानाच्या यशासाठी तसेच देशातील सर्व युवकांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.






