रत्नागिरी : मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीच्या जतन व संवर्धनासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे सुमारे २५ कोटी रुपये खर्चून एक एकर जागेत अत्याधुनिक मराठी भाषा संग्रहालय उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली. या संग्रहालयामध्ये बोलीभाषा संशोधन केंद्र, पुस्तक विक्री केंद्र, शब्दकोश निर्मिती दालन तसेच आधुनिक संशोधनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मराठी भाषेच्या अभ्यासकांसाठी हे केंद्र महत्त्वाचे संशोधन केंद्र ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. याशिवाय साने गुरुजींच्या पालगड येथे ‘पुस्तकांचे गाव’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार असून, पुण्यानंतर राज्यातील दुसरा सर्वात मोठा पुस्तक महोत्सव रत्नागिरीत आयोजित करण्याचा निर्णयही जाहीर करण्यात आला. जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित मराठी भाषा विभागाच्या आढावा बैठकीत तसेच साहित्यिकांशी संवाद साधताना उदय सामंत यांनी या विविध योजनांची माहिती दिली. यावेळी महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. प्रदीप ढवळ, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी, मराठी भाषा समितीचे सदस्य प्रकाश देशपांडे, गजानन पाटील, प्रा. शिवराज गोपाळे, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, प्रांताधिकारी जीवन देसाई तसेच विश्वकोश निर्मिती मंडळ आणि राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ. शामकांत देवरे यांची उपस्थिती होती. बैठकीत साहित्यिकांच्या सूचना ऐकून घेत आगामी उपक्रमांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र मराठी भाषा विभागाचे कार्यालय सुरू करून मराठी भाषा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. तसेच मुंबईतील नरिमन पॉईंट येथे १०० कोटी रुपये खर्चून मराठी भाषा भवन आणि ऐरोली येथे ४० कोटी रुपये खर्चून संशोधन केंद्र उभारण्यात येणार असल्याचेही सामंत यांनी सांगितले. महिला साहित्य संमेलन आणि युवा साहित्य संमेलनासाठी प्रत्येकी ५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मराठी भाषेचा जागतिक स्तरावर विस्तार करण्यासाठीही विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. बेळगाव सीमाभागातील २०० ग्रंथालयांना २ कोटी रुपयांची आर्थिक मदत, तंजावर येथील सरस्वती ग्रंथालयाला तब्बल ३५ वर्षांनंतर सहाय्य तसेच दिल्लीतील जेएनयूमध्ये कवी कुसुमाग्रज अध्यासन केंद्रासाठी १० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली. याच विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्यावर एम.ए. अभ्यासक्रम सुरू करण्यात आला असून, परिसरात महाराजांचा अश्वारूढ पुतळाही उभारण्यात येणार आहे. नागपूर, चंद्रपूर, अमरावती, नाशिक, कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे मराठी भाषा विकास केंद्रे सुरू करण्याचाही निर्णय जाहीर करण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठीचा प्रचार-प्रसार करण्यासाठी लंडनमधील महाराष्ट्र मंडळाची ऐतिहासिक वास्तू शासनाने विकत घेतली असून, तेथे आंतरराष्ट्रीय मराठी भाषा वैश्विक केंद्र उभारण्यात येणार आहे. दुबई एक्स्पो आणि जपानमध्ये मराठी संस्कृतीचे यशस्वी सादरीकरण झाल्याचा उल्लेख करत पुढील वर्षीचे विश्व मराठी संमेलन परदेशात आयोजित करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. धावत्या रेल्वेत आयोजित करण्यात आलेल्या जगातील पहिल्या ग्रामीण साहित्य संमेलनाचा उल्लेख करत मराठी भाषेचा वाढता जागतिक प्रभाव अधोरेखित करण्यात आला. या सर्व उपक्रमांमुळे मराठी भाषा, साहित्य, संशोधन आणि सांस्कृतिक वारशाला नवे व्यासपीठ मिळणार असून, राज्यासह जागतिक स्तरावर मराठीची ओळख अधिक व्यापक करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले जात असल्याचे उदय सामंत यांनी यावेळी सांगितले.






