मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यभर राबविण्यात येणाऱ्या नशामुक्ती जनजागृती अभियानाचा शुभारंभ गुरुवार, ३० जुलै रोजी सकाळी ११ वाजता वरळी येथील एनएससीआय डोम येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून राज्यभर अमली पदार्थांच्या वाढत्या धोक्याविरोधात व्यापक जनजागृती केली जाणार असून, युवक, विद्यार्थी, पालक आणि समाजातील विविध घटकांना नशामुक्त समाज उभारण्याच्या चळवळीत सहभागी करून घेण्यावर भर दिला जाणार आहे. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री तथा नशामुक्ती जनजागृती अभियानाच्या उच्चस्तरीय समितीचे अध्यक्ष मंगलप्रभात लोढा यांनी मुंबईकरांना, विशेषतः युवक-युवती आणि विद्यार्थ्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून नशामुक्त समाज घडविण्याची प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन केले आहे. या अभियानांतर्गत वर्षभर विविध जनजागृती उपक्रम, चर्चासत्रे, मार्गदर्शन कार्यक्रम आणि सामाजिक सहभागावर आधारित उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. ‘अमली पदार्थांना नकार द्या, जीवनाला होकार द्या’ हा संदेश समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचविणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट असून, विद्यार्थ्यांना आणि युवकांना व्यसनमुक्त, निरोगी आणि जबाबदार जीवनशैली स्वीकारण्यासाठी प्रेरित करण्यावर विशेष भर दिला जाणार आहे. या उपक्रमासाठी मुंबईतील शाळा, महाविद्यालये, समुपदेशक, पालक, स्वयंसेवी संस्था आणि विविध सामाजिक संघटनांना एकत्र आणले जाणार असून, प्रत्यक्ष कार्यक्रमाबरोबरच अनेक शैक्षणिक संस्थांतील विद्यार्थी ऑनलाइन माध्यमातूनही सहभागी होणार आहेत.
या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. याशिवाय बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्त अश्विनी भिडे, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, कोकण विभागीय आयुक्त रूबल अग्रवाल, मुंबई शहर जिल्हाधिकारी आंचल गोयल, मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले की, अमली पदार्थांच्या विळख्यात युवक अडकू नयेत आणि समाजात व्यसनमुक्तीबाबत व्यापक जनजागृती व्हावी, यासाठी शासनाने ही व्यापक मोहीम हाती घेतली आहे. या अभियानाद्वारे शाळा, महाविद्यालये, स्वयंसेवी संस्था, नागरिक आणि विविध सामाजिक घटकांचा सक्रिय सहभाग घेऊन नशामुक्त मुंबई आणि त्यानंतर नशामुक्त महाराष्ट्र घडविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. नशेच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी केवळ प्रशासन नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकाने जागरूक राहणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. सुरक्षित, सशक्त आणि व्यसनमुक्त समाज निर्माण करण्यासाठी नागरिकांनी या अभियानात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, तसेच युवकांना सकारात्मक जीवनमूल्ये आणि जबाबदार जीवनशैलीकडे प्रेरित करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.





