पालघर : जुलै महिन्यात दोन टप्प्यांत झालेल्या अतिवृष्टीमुळे पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वित्तहानी झाली असून पूरग्रस्तांना तातडीने दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मदत वितरण आणि पंचनाम्यांची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू केली आहे. आतापर्यंत १५ हजार ४७२ पूरग्रस्त कुटुंबांची नोंद करण्यात आली असून त्यापैकी ७ हजार ४६९ पात्र कुटुंबांच्या बँक खात्यात शासन नियमानुसार ३ कोटी ६६ लाख ३१ हजार ५७५ रुपयांची आर्थिक मदत थेट जमा करण्यात आली आहे. तसेच अतिवृष्टीमुळे मृत्यू झालेल्या २० जणांच्या प्रकरणांपैकी १२ पात्र वारसांना प्रत्येकी शासनाच्या नियमानुसार मदत देत एकूण ४८ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. उर्वरित प्रकरणांमध्ये वारसांची पडताळणी आणि आवश्यक कागदपत्रांची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी दिली. जुलैच्या पहिल्या आठवड्यात तसेच २२ ते २४ जुलैदरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. हजारो घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले, तर घरांची पडझड, झोपड्या व गोठ्यांचे नुकसान, पशुधनाची हानी आणि सार्वजनिक मालमत्तेचेही मोठे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर महसूल विभागासह सर्व संबंधित यंत्रणा तातडीने कार्यान्वित करण्यात आल्या असून मदतकार्याला गती देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली लाभार्थ्यांची नोंदणी, पंचनामे आणि आर्थिक मदत थेट बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू आहे.
२२ ते २४ जुलैदरम्यान झालेल्या अतिवृष्टीत तलासरी, डहाणू आणि पालघर तालुक्यातील ७ हजार ५०३ घरांमध्ये पाणी शिरल्याची नोंद झाली आहे. त्यापैकी आतापर्यंत ३ हजार ४५० पंचनामे पूर्ण झाले असून उर्वरित पंचनाम्यांचे काम महसूल यंत्रणेमार्फत प्राधान्याने सुरू आहे. कोणताही पात्र लाभार्थी मदतीपासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रशासन २४ तास कार्यरत असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांनी स्पष्ट केले. घरांची पूर्ण किंवा अंशतः पडझड झालेल्या प्रकरणांमध्ये घरे, झोपड्या आणि गोठ्यांच्या नुकसानीसाठी आतापर्यंत २४ लाख ९५ हजार रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे. पशुधनाच्या नुकसानीसाठी ३ लाख २२ हजार रुपयांची मदत देण्यात आली असून इतर नुकसानग्रस्त प्रकरणांची पडताळणीही सुरू आहे. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्ते, पूल आणि इतर पायाभूत सुविधांचे प्राथमिक नुकसान सुमारे १४८ कोटी रुपये असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. उर्वरित पात्र लाभार्थ्यांचे बँक तपशील आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होताच त्यांच्या खात्यातही मदतीची रक्कम जमा केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पूरग्रस्तांना वेळेत आर्थिक मदत मिळावी आणि पुनर्वसनाची प्रक्रिया जलदगतीने पूर्ण व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचेही सांगण्यात आले.





