शिर्डी : श्री साईबाबा संस्थानच्या वतीने २८ ते ३० जुलैदरम्यान गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार असून, यंदाच्या उत्सवानिमित्त साईभक्तांसाठी एक आगळावेगळा आणि पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात येणार आहे. गुरुस्थान येथील पवित्र कडुनिंबाच्या वृक्षाच्या बियांपासून तयार करण्यात आलेली रोपे साईप्रसाद म्हणून भाविकांना उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय संस्थानने घेतला आहे. या उपक्रमांतर्गत प्रायोगिक तत्त्वावर तब्बल एक लाख कडुनिंबाची रोपे तयार करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात सुमारे पाच ते सहा हजार रोपांचे वाटप गुरुपौर्णिमेपासून सुरू होणार आहे. साईबाबांचे शिर्डीतील प्रथम आगमन गुरुस्थानातील पवित्र कडुनिंबाच्या वृक्षाखाली झाले होते आणि त्यांनी प्रारंभीची साधना याच ठिकाणी केल्याची श्रद्धा आहे. श्री साईसच्चरित्रामध्येही या स्थळाचा साईबाबांचे गुरुस्थान म्हणून उल्लेख करण्यात आला असून, खोदकामादरम्यान समयी, पणत्या आणि सारवलेली जागा आढळल्याचा उल्लेखही त्यात आहे. त्यामुळे साईभक्तांच्या दृष्टीने गुरुस्थान आणि तेथील कडुनिंबाचे झाड हे श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माचे प्रतीक मानले जाते. या भावनेला पर्यावरण संवर्धनाची जोड देण्यासाठी संस्थानने गुरुस्थानासह परिसरातील कडुनिंबाच्या बिया संकलित करून त्यापासून रोपे तयार करण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. संस्थानच्या बगीचा विभागामार्फत प्रथम छोट्या पिशव्यांमध्ये बिया रुजवून त्यानंतर मोठ्या पिशव्यांमध्ये त्यांची काळजीपूर्वक जोपासना केली जात आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी सुमारे १५ लाख रुपयांचा खर्च अपेक्षित असून, ही रोपे लेंडी बागेतील स्टॉलवरून भाविकांना प्रति रोप केवळ २० रुपयांच्या नाममात्र दरात उपलब्ध करून दिली जाणार आहेत. भाविकांच्या प्रतिसादानुसार पुढील काळात रोपनिर्मितीचा वेगही वाढविण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
या उपक्रमासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी विशेष पुढाकार घेतला असून, जिल्हा प्रधान न्यायाधीश शिवाजीराव कचरे यांच्या अध्यक्षतेखालील तसेच जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांचा समावेश असलेल्या संस्थानच्या तदर्थ समितीने या योजनेचे सामाजिक आणि पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेऊन तातडीने मंजुरी दिली आहे. गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले की, साईबाबा आणि गुरुस्थानातील कडुनिंबाचे नाते अतूट असून, भाविकांच्या श्रद्धेला पर्यावरण संवर्धनाची जोड देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. प्रसाद म्हणून घरी नेलेली रोपे भाविक प्रेमाने वाढवतील, त्यामुळे श्रद्धेचे संवर्धन होण्याबरोबरच पर्यावरण संरक्षणालाही मोठी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कडुनिंब हा पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त वृक्ष मानला जातो. आयुर्वेदात त्याला सर्वरोगनिवारक गुणधर्म असलेला वृक्ष म्हणून महत्त्व आहे, तर शेतीमध्ये तो प्रभावी नैसर्गिक कीटकनाशक म्हणून वापरला जातो. भाविकांनी नेलेल्या रोपांपैकी निम्मी रोपे जरी जगली, तरी देश-विदेशात लाखो वृक्ष उभे राहून पर्यावरण संवर्धनाला मोठे बळ मिळेल, असा विश्वास संस्थानने व्यक्त केला आहे. श्रद्धा, अध्यात्म आणि पर्यावरण संरक्षण यांचा सुंदर संगम घडवून आणणाऱ्या या उपक्रमाचे साईभक्तांसह पर्यावरणप्रेमींकडून मोठ्या प्रमाणावर स्वागत होत असून, धार्मिक परंपरेला पर्यावरण संवर्धनाची जोड देणारा हा अभिनव उपक्रम भविष्यात देशातील इतर धार्मिक संस्थांसाठीही आदर्श ठरेल, अशी भावना व्यक्त केली जात आहे.






