वसई : मान्सूनच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिमंडळ-२ अंतर्गत येणाऱ्या धबधबे, समुद्रकिनारे आणि निसर्ग पर्यटनस्थळांवर प्रतिबंधात्मक मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. पोलीस उपआयुक्त अशोक विरकर यांनी जारी केलेला हा आदेश ३ ऑगस्टपर्यंत लागू राहणार असून, त्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम २२३ अंतर्गत कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. पावसाळ्याच्या काळात पालघर, ठाणे, मुंबई, रायगड आणि इतर परिसरांतून मोठ्या संख्येने पर्यटक वसई परिसरातील धबधबे, समुद्रकिनारे आणि नैसर्गिक पर्यटनस्थळांना भेट देतात. मात्र, अतिवृष्टी, वेगवान पाण्याचा प्रवाह, घसरडे खडक आणि वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या घटना लक्षात घेता नागरिकांच्या जीवित व वित्तहानीची शक्यता टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. वसई, नायगाव आणि वालीव पोलीस ठाण्यांकडून वाढती गर्दी व संभाव्य अपघातांचा धोका प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर हा आदेश लागू करण्यात आला. महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सार्वजनिक ठिकाणी छेडछाड, टिंगलटवाळी, अश्लील हावभाव, शेरेबाजी किंवा लज्जास्पद वर्तन करणाऱ्यांवरही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. या काळात संबंधित पर्यटनस्थळांवर पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली असून, पावसाच्या पाण्यात उतरून पोहणे, खोल पाण्यात जाणे, धबधब्याखाली बसणे, धोकादायक ठिकाणी किंवा कठड्यांवर उभे राहून सेल्फी काढणे अथवा चित्रीकरण करणे यावरही बंदी असेल. तसेच मद्यपान करून किंवा मद्य बाळगून पर्यटनस्थळी प्रवेश करणे, अनधिकृत मद्यविक्री, सार्वजनिक ठिकाणी मद्यसेवन, धोकादायक पद्धतीने वाहने उभी करणे किंवा बेदरकार वाहन चालविणे यावरही कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
या आदेशानुसार वसई पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरुची बीच, रानगाव बीच, ब्रह्मपाडा बीच, भुईगाव बीच, बेनापट्टी बीच, वसई किल्ला जेटी आणि पाचूबंदर जेटी, नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चिंचोटी धबधबा आणि कामण देवकुंडी, तसेच वालीव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजीवली खदान आणि खैरपाडा-धुमाळनगर खदान परिसराच्या १०० मीटरच्या परिघात हे निर्बंध लागू राहणार आहेत. पर्यावरण संवर्धनालाही या आदेशात विशेष महत्त्व देण्यात आले असून, सार्वजनिक ठिकाणी प्लास्टिक, काचेच्या बाटल्या, थर्माकोल किंवा इतर कोणताही कचरा टाकण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच ध्वनी, वायू आणि जलप्रदूषण होईल अशा कोणत्याही कृतीवर बंदी घालण्यात आली असून, मोठ्या आवाजात डीजे, संगीत यंत्रणा किंवा वाहनांमधील स्पीकर वाजवण्यास परवानगी दिली जाणार नाही. पोलीस प्रशासनाने नागरिक आणि पर्यटकांना नियमांचे काटेकोरपणे पालन करून सुरक्षिततेला प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. पावसाळ्यात धोकादायक ठिकाणी पर्यटन करण्याचा मोह टाळावा, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि स्वतःच्या तसेच इतरांच्या सुरक्षिततेची जबाबदारी ओळखून सहकार्य करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. मान्सूनच्या काळात वाढणाऱ्या अपघातांना आळा घालणे, पर्यटकांचे प्राण वाचवणे, महिलांच्या सुरक्षिततेची हमी देणे आणि पर्यावरणाचे संरक्षण करणे हा या प्रतिबंधात्मक आदेशामागील प्रमुख उद्देश असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
बंदी घालण्यात आलेली प्रमुख प्रसिद्ध पर्यटनस्थळे:
१. समुद्रकिनारे
- सुरुची समुद्रकिनारा
- रानगाव समुद्रकिनारा
- भुईगाव समुद्रकिनारा
- बेनापट्टी समुद्रकिनारा
- ब्राह्मणपाडा समुद्रकिनारा
- अर्नाळा समुद्रकिनारा
- कळंब, नवापूर आणि राजोडी समुद्रकिनारा
२. धबधबे आणि खदाणी
- चिंचोटी धबधबा
- तुंगारेश्वर धबधबा
- कामण येथील देवकुंडी धबधबा
- राजावळी खदाण (खाण परिसर)
३. धरणे आणि तलाव
- फुलपाडा धरण
- पेल्हार धरण
- तानसा नदी परिसर
- कुंभारपाडा तलाव






