मुंबई : महसूल विभाग अधिक लोकाभिमुख, पारदर्शक आणि गतिमान करण्याच्या उद्देशाने शासनाच्या विविध योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी मुंबई शहर जिल्ह्यात ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियान राबविण्यात येत आहे. मुंबई शहर जिल्ह्याचे अपर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात यांनी ही माहिती दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जन्मदिनानिमित्त तसेच दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय, मुंबई शहर यांच्या वतीने २२ जुलै ते २ ऑगस्ट २०२६ या कालावधीत मुंबई शहरातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात या विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानांतर्गत १७८-धारावी विधानसभा मतदारसंघातील भारतरत्न राजीव गांधी जिल्हा क्रीडा संकुल येथे महसूल समाधान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना अपर जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात यांनी सांगितले की, राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये हे अभियान राबविण्याचा शासनाचा उद्देश नागरिकांना विविध शासकीय सेवा आणि कल्याणकारी योजनांचा लाभ ‘एकाच छताखाली’ उपलब्ध करून देणे हा आहे. यामुळे नागरिकांना वेगवेगळ्या कार्यालयांच्या फेऱ्या मारण्याची गरज भासणार नसून वेळ, श्रम आणि खर्चाची बचत होणार आहे. शासनाच्या सेवा अधिक सुलभ, पारदर्शक आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने हे अभियान महत्त्वाचे ठरत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत दिले जाणारे विविध महसुली दाखले, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सेवा, आधार सेवा, दिव्यांग सेवा, संजय गांधी निराधार योजनेशी संबंधित सुविधा, रेशन कार्डविषयक सेवा अशा एकूण २९ विविध शासकीय सेवा या शिबिरामध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या. नागरिकांना आवश्यक सेवा एकाच ठिकाणी सहज मिळाव्यात यासाठी विविध विभागांचे १९ स्वतंत्र स्टॉल उभारण्यात आले असून नागरिकांनी या सुविधांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले.
या कार्यक्रमाला धारावीच्या आमदार डॉ. ज्योती गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी आपल्या मनोगतात धारावीसारख्या दाट लोकवस्तीच्या परिसरातील कष्टकरी, सर्वसामान्य आणि गरजू नागरिकांपर्यंत शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी हे अभियान अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे सांगितले. अशा शिबिरांमुळे नागरिकांना विविध शासकीय योजनांची माहिती मिळण्याबरोबरच आवश्यक कागदपत्रे, प्रमाणपत्रे आणि सेवा सहज उपलब्ध होत असल्याने प्रशासनाविषयीचा विश्वास अधिक दृढ होत असल्याचे त्यांनी नमूद केले. या शिबिरामध्ये प्रातिनिधिक स्वरूपात १०९ लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यावेळी मुंबई शहरचे उपजिल्हाधिकारी अजित नैराळे, जिल्हा नियोजन अधिकारी संजयकुमार शिंदे तसेच विविध संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पंकज चव्हाण यांनी केले, तर निवासी उपजिल्हाधिकारी शिवनंदा लंगडापुरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. नागरिकांना शासकीय सेवा अधिक वेगाने, सुलभ पद्धतीने आणि पारदर्शक रीतीने उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणारे ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ हे अभियान शासनाच्या लोकाभिमुख प्रशासनाच्या संकल्पनेला बळकटी देणारे ठरत असून, विविध योजनांचा लाभ तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचविण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.






