अहिल्यानगर : दिल्लीमध्ये सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी गुरुवारी अहिल्यानगर शहरात मौन आंदोलन सुरू केले. नगर शहरातील वाडिया पार्क क्रीडा संकुल परिसरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन सुरू करण्यात आले असून, यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी, तरुण आणि विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सहभागी नागरिकांनी हातात तिरंगा ध्वज घेत आंदोलनात सहभाग नोंदवला. अण्णा हजारे यांनी भारतमातेचे पूजन करून मौनव्रत स्वीकारत आंदोलनाला सुरुवात केली. विशेष म्हणजे, तब्बल सहा वर्षांनंतर त्यांनी पुन्हा मौन आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे. यापूर्वी २०१९ मध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राळेगणसिद्धी येथे त्यांनी मौन आंदोलन केले होते. काही दिवसांपूर्वी माहिती अधिकार कायद्याच्या नियमावलीत करण्यात आलेल्या बदलांविरोधातही त्यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र, आंदोलन सुरू होण्यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित नियमावलीला स्थगिती दिल्यानंतर ते आंदोलन स्थगित करण्यात आले होते. गुरुवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास राळेगणसिद्धीहून अहिल्यानगरात पोहोचल्यानंतर अण्णा हजारे यांनी आंदोलनाची सुरुवात केली. यावेळी अनामप्रेम संस्थेच्या अंध विद्यार्थ्यांनी देशभक्तिपर गीते सादर केली. तसेच अण्णा हजारे यांच्या चळवळीतील ॲड. श्याम आसावा, ॲड. कारभारी गवळी, दीपक पापडेजा, संदीप कुसळकर, सुधीर भद्रे यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे सुभाष तळेकर, अशोक मासाळ, विलास पेद्राम आदींनीही आंदोलनस्थळी उपस्थित राहून पाठिंबा जाहीर केला. यावेळी विविध विद्यार्थी संघटनांनी नीट परीक्षार्थींच्या आत्महत्यांच्या घटनांकडे लक्ष वेधत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली आणि घोषणाबाजीही करण्यात आली.
आंदोलनापूर्वी अण्णा हजारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली. पत्रामध्ये त्यांनी दिल्लीतील विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीमाराबाबत चिंता व्यक्त करत सरकारने आंदोलनकर्त्यांशी लोकशाही मार्गाने संवाद साधण्याची आवश्यकता अधोरेखित केली आहे. लोकशाही व्यवस्थेत जनतेचा आवाज दडपण्याऐवजी संवादातून प्रश्न सोडवले गेले पाहिजेत, असे त्यांनी नमूद केले. विद्यार्थी आणि पालक मागील २५ दिवसांपासून शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असून संबंधित मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. उत्तरदायित्व स्वीकारून एखाद्या मंत्र्याचा राजीनामा घेतल्याने सरकारची सत्ता धोक्यात येत नाही, उलट प्रशासनात जबाबदारीची भावना निर्माण होते आणि शासनाचा कारभार अधिक प्रभावी होण्यास मदत होते, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे. तसेच सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना उपोषणस्थळावरून बळाचा वापर करून हटविण्यापूर्वी सरकारने त्यांच्याशी कोणतीही चर्चा केली नसल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली. इतके दिवस दिल्लीत आंदोलन सुरू असतानाही सरकारच्या कोणत्याही प्रतिनिधीने आंदोलनकर्त्यांशी संवाद साधण्याचा प्रयत्न न केल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. दरम्यान, दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कथित लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ अहिल्यानगर शहरात विविध सामाजिक संस्था, विद्यार्थी संघटना आणि नागरिकांकडून निदर्शने करण्यात येत असून विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे.






