बारामती : राज्य शासन महिला सक्षमीकरण, मुलींचे शिक्षण आणि माता-भगिनींच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देत असून, गर्भाशयमुखाच्या कर्करोगाविषयी जनजागृती आणि प्रतिबंधात्मक आरोग्य मोहिमेलाही गती देत आहे, असे प्रतिपादन राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले. बारामती येथील ग. दि. मा. सभागृह, विद्यानगरी येथे ‘आदिशक्ती’ आणि ‘टू व्हील्स ऑफ होप सायकल बँक’ उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील एक दशलक्ष विद्यार्थिनींसाठी सायकल वितरण अभियानाच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी खासदार तथा ज्येष्ठ समाजसेविका पद्मविभूषण सुधा मूर्ती, खासदार स्वाती मालीवाल, जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील तसेच विविध लोकप्रतिनिधी, अधिकारी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते. सुनेत्रा पवार म्हणाल्या की, माता-भगिनी कुटुंबातील प्रत्येकाची काळजी घेतात; मात्र स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. ही मानसिकता बदलणे आवश्यक असून, कोणतीही पात्र महिला केवळ माहितीच्या अभावामुळे शासकीय योजनांपासून वंचित राहू नये, कोणतेही बालक पोषण सेवांपासून दूर राहू नये आणि कोणतीही मुलगी अंतर किंवा परिस्थितीमुळे शिक्षण सोडू नये, या उद्दिष्टाने शासन सातत्याने कार्यरत आहे. आजच्या कार्यक्रमातून दोन हजार सायकलींचे वितरण, डिजिटल वर्ग, स्टेम प्रयोगशाळा, विज्ञान-अनुभव कार्यक्रम, शाळांमधील पाणी व स्वच्छता सुविधा तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम सुरू करण्यात आले. गुणवत्तापूर्ण शिक्षण ग्रामीण-शहरी, मुलगा-मुलगी किंवा सक्षम-वंचित अशा कोणत्याही भेदांमध्ये अडकता कामा नये, हेच या सर्व उपक्रमांचे समान ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शासन, स्थानिक स्वराज्य संस्था, उद्योग, बँका, विद्यापीठे, सामाजिक संस्था, शिक्षक, आरोग्य कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक या सर्व घटकांच्या संयुक्त सहभागातून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात सकारात्मक परिवर्तन घडविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. मुलींना सायकली उपलब्ध झाल्यानंतर माध्यमिक शिक्षणातील त्यांचा सहभाग वाढल्याचे आणि मुला-मुलींमधील शैक्षणिक दरी कमी झाल्याचे विविध अभ्यासांतून स्पष्ट झाले आहे. विशेषतः ग्रामीण भागात सायकल ही अंतर, वेळ आणि सुरक्षिततेशी संबंधित अडथळे दूर करणारे प्रभावी साधन ठरले असून, योग्य संधी मिळाल्यास मुलगी केवळ शाळेतच पोहोचत नाही तर स्वतःच्या उज्ज्वल भविष्याकडेही वाटचाल करते, असे त्यांनी नमूद केले.
सुनेत्रा पवार यांनी ‘आदिशक्ती’ हा केवळ एका विभागाचा किंवा एका दिवसाचा कार्यक्रम नसून महिला सक्षमीकरणाचा जीवनचक्राधारित व्यापक उपक्रम असल्याचे सांगितले. आरोग्य, शिक्षण, पोषण, कौशल्य विकास, वित्तीय समावेशन, सुरक्षितता, सामाजिक संरक्षण, ग्रामविकास, नगरविकास आणि स्थानिक स्वराज्य संस्था या सर्व क्षेत्रांना जोडून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी हा उपक्रम राबविला जाणार आहे. गर्भवती मातांची काळजी, बालकांचे पोषण, लसीकरण, आरोग्य तपासणी, पूर्वप्राथमिक शिक्षण, जनजागृती आणि संकटाच्या काळात नागरिकांना मदत अशा प्रत्येक स्तरावर प्रभावी सेवा पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आरोग्य कर्मचारी आणि अंगणवाडी सेविकांना टॅब्लेट, आवश्यक आरोग्य साधने, चष्मे, प्रवासाची साधने, प्रशिक्षण आणि डिजिटल सुविधा उपलब्ध करून देणे ही सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेतील दीर्घकालीन गुंतवणूक असल्याचे त्यांनी सांगितले. उद्योग आणि सामाजिक उत्तरदायित्व निधी (CSR) संस्थांनी विकासकामांसाठी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानत, पुढील काळात शाळा, गाव, आरोग्य प्रकल्प किंवा महिला सक्षमीकरण उपक्रम तीन ते पाच वर्षांसाठी दत्तक घेऊन प्रशिक्षण, तंत्रज्ञान, रोजगाराशी जोडणी आणि परिणाम मापनामध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. पद्मविभूषण सुधा मूर्ती यांच्या साधेपणा, संवेदनशीलता आणि निःस्वार्थ समाजसेवेचा आदर्श समाजाने घ्यावा, तर खासदार स्वाती मालीवाल यांनी महिलांच्या सुरक्षितता, न्याय आणि सन्मानासाठी केलेल्या कार्याचा उल्लेख करत महिलांच्या आवाजाला वेळेवर आणि संवेदनशील प्रतिसाद मिळणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. या दोन्ही कर्तृत्ववान महिलांची उपस्थिती राज्यातील मुली आणि माता-भगिनींसाठी प्रेरणादायी असून, मोठी स्वप्ने पाहण्याचे, स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवण्याचे आणि ती पूर्ण करण्यासाठी धैर्याने पुढे जाण्याचे बळ देणारी असल्याचेही त्यांनी नमूद केले. महिला सक्षमीकरण, आरोग्य संरक्षण, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि सामाजिक समतेच्या माध्यमातून अधिक सक्षम महाराष्ट्र घडविण्याचा शासनाचा संकल्प असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.







