पंढरपूर : यंदाची आषाढी वारी वारकऱ्यांसाठी अधिक सुरक्षित, सुलभ आणि आरोग्यदायी करण्याच्या उद्देशाने राज्याच्या आरोग्य विभागाने प्रथमच अत्यावश्यक रुग्णांसाठी एअर ॲम्बुलन्सची सुविधा उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी पंढरपूर येथील केबीपी महाविद्यालयात पालखी मार्ग तसेच मुक्कामस्थळी उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांचा सविस्तर आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. त्यांनी सांगितले की, गंभीर रुग्णांना कमी वेळेत उच्चस्तरीय वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी प्रथमच एअर ॲम्बुलन्सची व्यवस्था करण्यात आली असून, ही सुविधा वारीतील आरोग्य व्यवस्थापनासाठी महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. याशिवाय, गर्दीच्या ठिकाणी त्वरित पोहोचण्यासाठी बाईक ॲम्बुलन्स, आधुनिक जीवनरक्षक उपकरणांनी सुसज्ज रुग्णवाहिका, प्रशिक्षित वैद्यकीय पथके आणि आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा सतत कार्यरत राहणार आहेत. पालखी मार्गावरील प्रत्येक टप्प्यावर आरोग्य सेवा उपलब्ध राहाव्यात यासाठी व्यापक नियोजन करण्यात आले असून, वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारची आरोग्यविषयक अडचण निर्माण झाल्यास तातडीने उपचार मिळतील, याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. तसेच जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग आणि विविध यंत्रणांमध्ये प्रभावी समन्वय ठेवून सेवा अधिक सक्षमपणे राबविण्याच्या सूचनाही आरोग्यमंत्र्यांनी दिल्या. वारकऱ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक औषधसाठा, मनुष्यबळ आणि आपत्कालीन सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, यंदाची वारी आरोग्य व्यवस्थापनाच्या दृष्टीने अधिक सक्षम आणि आधुनिक ठरणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ आणि ‘आरोग्यसंपन्न वारी’ या डिजिटल उपक्रमांच्या माध्यमातून वारकरी भाविकांना पालखी मार्गावरच आरोग्यविषयक माहिती, मार्गदर्शन आणि तातडीच्या उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. प्रत्येक आरोग्य कर्मचारी आणि आशा सेविकेमार्फत आवश्यक आरोग्य संदेश, आजार प्रतिबंधक उपाययोजना तसेच उपचार सेवा थेट भाविकांपर्यंत पोहोचविण्यात येणार असून, वारकरी घरातून वारीसाठी प्रस्थान केल्यापासून ते सुखरूप घरी परतेपर्यंत त्यांच्या आरोग्याची सातत्याने काळजी घेण्याचे व्यापक नियोजन करण्यात आले आहे. बैठकीच्या प्रारंभी आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक संजय काटकर यांनी पालखी मार्गावरील आरोग्य केंद्रे, तात्पुरती वैद्यकीय पथके, औषधसाठा, रुग्णवाहिका सेवा, आपत्कालीन प्रतिसाद व्यवस्था तसेच उपलब्ध मनुष्यबळ याबाबत सविस्तर माहिती सादर केली. त्यांनी सांगितले की, प्रत्येक टप्प्यावर आरोग्य सुविधा प्रभावीपणे कार्यरत राहतील यासाठी आवश्यक तयारी पूर्ण करण्यात आली आहे. यंदाची आषाढी वारी ही केवळ भक्ती आणि अध्यात्माचा उत्सव न राहता अत्याधुनिक आरोग्य व्यवस्थापनाचा आदर्श ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. या बैठकीस आमदार समाधान आवताडे, आमदार राजू खरे, आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक संजय काटकर तसेच पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यांतील प्रशासन व आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी प्रत्यक्ष तसेच दृकश्राव्य माध्यमातून उपस्थित होते. वारीदरम्यान लाखो भाविकांना सुरक्षित, जलद आणि प्रभावी आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाने केलेले हे नियोजन वारकऱ्यांच्या आरोग्य संरक्षणासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे.







