मुंबई : विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी देशातील शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि प्रगत होणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन अभिनेते आमिर खान यांनी केले. राज्यभर राबविण्यात येत असलेल्या फार्मर कप उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत १८ हजारांहून अधिक शेतकरी गटांची निर्मिती झाली असून, या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये सामूहिक कामकाजाची भावना आणि आत्मविश्वास वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. या संपूर्ण उपक्रमात मार्गदर्शकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे नमूद करत त्यांनी, जसा एक चांगला शिक्षक विद्यार्थ्यांचे भविष्य घडवतो, त्याचप्रमाणे मार्गदर्शक शेतकरी गटांना योग्य दिशा देऊन त्यांच्या प्रगतीत मोलाचे योगदान देऊ शकतात, असे सांगितले.
डिजिटल माध्यम आणि प्रत्यक्ष संवाद यांचा प्रभावी संगम या उपक्रमात करण्यात आला असून, डिजिटल माध्यमातून कमी खर्चात मोठ्या संख्येने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचता येते, तर प्रत्यक्ष भेटीतून विश्वास आणि आत्मीयता निर्माण होते. या दोन्ही माध्यमांच्या एकत्रित वापरामुळे हा उपक्रम अधिक परिणामकारक ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपक्रमाच्या उच्चस्तरीय समितीतील सर्व सदस्यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत त्यांचे आभार मानले. कृषी विद्यापीठांतील प्राध्यापक आणि वैज्ञानिक शेतकऱ्यांना आधुनिक ज्ञान, तंत्रज्ञान आणि अनुभव उपलब्ध करून देत असल्याने त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी नमूद केले. शेतकरी एकत्र आल्यास त्यांची ताकद वाढते आणि गटशेती तसेच सामूहिक निर्णय प्रक्रियेमुळे शेती अधिक सक्षम बनते, असे सांगत त्यांनी यंदाचे वर्ष पावसाच्या दृष्टीने आव्हानात्मक ठरू शकते, अशी शक्यता व्यक्त केली. त्यामुळे गावागावांत जलसंधारणाची कामे वेगाने पूर्ण करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा‘ या संकल्पनेअंतर्गत सुरू असलेली अपूर्ण कामे पुढील १५ दिवसांत पूर्ण करण्याचे आवाहन करत त्यांनी पाण्याचे योग्य नियोजन आणि संवर्धन हीच शेतीच्या शाश्वत विकासाची गुरुकिल्ली असल्याचे सांगितले.







