वसई : वसई-विरार परिसरात कालपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला, तरी वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. जून महिन्याचा बहुतांश कालावधी उलटल्यानंतरही मान्सूनचे आगमन झाले नव्हते. गेल्या काही दिवसांपासून पहाटे अल्पकाळ पाऊस पडत असला तरी त्यानंतर दिवसभर तीव्र उकाडा जाणवत होता. मात्र मंगळवारी पहाटे झालेल्या पावसानंतर दिवसभर ढगाळ वातावरण कायम राहिले. संध्याकाळी हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळल्यानंतर रात्री पावसाचा जोर वाढला आणि अनेक भागांत संततधार पाऊस सुरू झाला. या सततच्या पावसामुळे शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचले असून काही ठिकाणी घरांमध्ये आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन कामकाजात अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला असून काही भागांमध्ये जनजीवन विस्कळीत झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पावसामुळे निर्माण झालेल्या या परिस्थितीत नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत असून स्थानिक प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
दरम्यान, पावसाळा सुरू होताच दरवर्षीप्रमाणे यंदाही वीजपुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वसई-विरार शहरात महावितरणमार्फत सुमारे दहा लाख ग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. गेल्या महिनाभरापासून मान्सूनपूर्व दुरुस्तीची कामे, धोकादायक झाडांच्या फांद्यांची छाटणी तसेच विविध तांत्रिक कारणांमुळे वीजपुरवठा खंडित होत होता. मात्र पावसाळ्याच्या सुरुवातीलाही ही समस्या कायम असल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे. विरार पश्चिमेतील उंबरगोठण, वसई पूर्वेतील मालजीपाडा, ससूनवघर तसेच नालासोपारा पूर्वेतील अनेक भागांमध्ये मंगळवार रात्रीपासून वीजपुरवठा खंडित झाला होता. बुधवारी सकाळपर्यंत अनेक ठिकाणी वीजपुरवठा सुरळीत झाला नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. वीजेवर चालणारी उपकरणे बंद पडल्यामुळे गृहिणी, शाळकरी मुले आणि कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. याशिवाय वसई पश्चिमेतील साईनगर परिसरात बुधवारी सकाळी रोहित्र फुटल्याची घटना घडली. या घटनेनंतर सुरक्षेच्या कारणास्तव काही काळ त्या परिसरातील वीजपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. पावसासोबतच वीजपुरवठ्याच्या समस्येमुळे नागरिकांच्या अडचणी वाढल्या असून वीज व्यवस्था लवकर सुरळीत करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.







