मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस दरवर्षी १४ जून रोजी राज्यभरातील कार्यकर्त्यांकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी मनसैनिक मोठ्या संख्येने त्यांच्या निवासस्थानी जाऊन शुभेच्छा देतात, तसेच विविध सामाजिक आणि पक्षीय उपक्रमही राबविले जातात. मात्र यंदा राज ठाकरे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांना वेगळा संदेश दिला आहे. यावर्षी १४ जून रोजी आपण मुंबईत नसल्यामुळे कार्यकर्त्यांची प्रत्यक्ष भेट घेता येणार नसल्याचे स्पष्ट करत त्यांनी वाढदिवस लोकोपयोगी उपक्रमांद्वारे साजरा करण्याचे आवाहन केले आहे. समाजमाध्यमांवर प्रसिद्ध केलेल्या पत्रातून त्यांनी कार्यकर्त्यांना शुभेच्छांच्या होर्डिंग्ज, पुष्पगुच्छ, मिठाई आणि केक यांवर खर्च करण्याऐवजी पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देण्याचे आवाहन केले. राज्यभर फुलझाडे, फळझाडे किंवा दीर्घकाळ टिकणारी मोठी झाडे लावावीत, त्यांची योग्य ठिकाणी लागवड करून त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्थानिक नागरिकांनाही सहभागी करून घ्यावी, असे त्यांनी म्हटले आहे. झाडे लावताना ती रस्ते रुंदीकरणासारख्या कामांमध्ये नष्ट होणार नाहीत याची काळजी घेण्याचाही सल्ला त्यांनी दिला.
राज ठाकरे यांनी पत्रात प्राणी आणि पक्ष्यांसाठी पाण्याची वाढती टंचाई हा गंभीर विषय असल्याचे नमूद केले आहे. उन्हाळ्यातच नव्हे तर वर्षाच्या सुरुवातीपासूनच अनेक भागांत प्राणी आणि पक्षी पाण्यासाठी भटकताना दिसत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे जंगलांच्या सीमेवर तसेच शहरांमध्ये भटक्या प्राण्यांसाठी पाणवठे उभारावेत आणि त्यामध्ये नियमित पाणी उपलब्ध राहील याची खबरदारी घ्यावी, असे त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले. हवामान बदल, कमी होत चाललेला पाऊस आणि वाढती वृक्षतोड यामुळे भविष्यात पर्यावरणासमोर मोठे आव्हान उभे राहू शकते, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली. वृक्षारोपण आणि पाणवठे उभारण्याचे उपक्रम केवळ एका दिवसापुरते मर्यादित न ठेवता त्यांचे सातत्याने जतन करावे, फोटो आणि प्रसिद्धीपेक्षा समाज व निसर्गाचे आशीर्वाद मिळवण्याला प्राधान्य द्यावे, असा संदेश त्यांनी दिला. लवकरच कार्यकर्त्यांशी प्रत्यक्ष भेट होईल, असे सांगत त्यांनी आपल्या पत्राचा शेवट केला.
राज ठाकरे यांच्या आवाहनातील महत्त्वाचे मुद्दे :
१. होर्डिंग्ज नको, निसर्गाचे आशीर्वाद घ्या: वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे मोठे होर्डिंग्ज किंवा बॅनर्स लावून शहरांचे विद्रुपीकरण करण्यापेक्षा पर्यावरणपूरक उपक्रम राबवा. फोटो काढून सोशल मीडियावर फक्त ‘लाईक्स’ मिळवण्यापेक्षा निसर्गाचे आशीर्वाद मिळवा, असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे.
२. फळझाडे आणि फुलझाडे लावा: आपल्या परिसरात फुलांची, फळांची किंवा दीर्घकाळ टिकतील अशी मोठी झाडे लावा. मोठी झाडे लावल्यास ती लवकर जगतात, तर लहान रोपांची योग्य काळजी न घेतल्यास ती सुकण्याची शक्यता असते.
३. पशू-पक्ष्यांसाठी पाणवठे: यंदाचा भीषण उन्हाळा लक्षात घेता, जंगलाच्या परिसरात तसेच शहरांमध्ये भटक्या प्राण्यांसाठी आणि पक्ष्यांसाठी पाण्याचे पाणवठे (पाण्याची भांडी) तयार करा आणि त्यामध्ये नियमित पाणी भरलेले राहील याची काळजी घ्या.
४. स्थानिकांना विश्वासात घ्या: झाडे लावताना ती भविष्यात रस्ते रुंदीकरणात किंवा इतर कामांत तोडली जाणार नाहीत अशा सुरक्षित जागा निवडा. वृक्षारोपण करताना परिसरातील स्थानिक नागरिकांना सहभागी करून घ्या, जेणेकरून ते नंतरही त्या झाडांना पाणी घालण्याची व संगोपन करण्याची जबाबदारी घेतील.







