वसई : राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानक परिसरात वाढणारी वाहतूक कोंडी आणि अवैध प्रवासी वाहतुकीला आळा घालण्यासाठी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार वसई-विरार शहरातील एसटी आगार परिसरात विशेष कारवाई मोहीम सुरू करण्यात आली आहे. या अंतर्गत बसस्थानकाच्या २०० मीटर परिसराला ‘नो पार्किंग झोन’ घोषित करण्यात आले असून अवैधरित्या वाहने उभी करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जात आहे. वसई-विरार परिसरातील नवघर, नालासोपारा, वसई, अर्नाळा आणि विरार या आगारांमधून दररोज लांब पल्ल्याच्या तसेच स्थानिक मार्गांवर एसटी सेवा चालवली जाते. मात्र, आगार परिसरात रिक्षा, दुचाकी आणि चारचाकी वाहने अनधिकृतपणे उभी राहत असल्याने बसच्या हालचालींमध्ये अडथळे निर्माण होत होते. विशेषतः बस वळविण्याच्या आणि ये-जा करण्याच्या मार्गांवर वाहने उभी राहत असल्याने वाहतूक कोंडी वाढत होती आणि प्रवाशांनाही मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत होता.
या समस्येवर तोडगा काढण्यासाठी एसटी महामंडळाने पालघर विभागात विशेष मोहीम सुरू केली आहे. सुरक्षा व दक्षता अधिकारी कल्पेश सोलंकी यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षा अधिकारी आणि वाहतूक पोलिसांच्या संयुक्त पथकाकडून ५ ते १५ जून दरम्यान ही धडक मोहीम राबवली जात आहे. नुकतीच नालासोपारा आणि विरार आगार परिसरात कारवाई करण्यात आली. सुरुवातीला वाहनचालकांना समज देऊन वाहने हटविण्याच्या सूचना देण्यात आल्या. मात्र, त्यानंतरही नियमांचे पालन न केल्याने संबंधित वाहनांवर कारवाई करण्यात आली. आतापर्यंत नालासोपारा आणि विरार या दोन्ही आगारांमध्ये मिळून १७ वाहनांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे. या मोहिमेत सहायक सुरक्षा निरीक्षक श्रविंद्र जाधव, मंगा चव्हाण तसेच वाहतूक पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. वसई-विरारपुरतीच नव्हे तर पालघर जिल्ह्यातील इतर एसटी आगारांमध्येही अशीच कारवाई पुढील काळात सुरू ठेवली जाणार असल्याचे एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे.







