मुंबई : दिल्लीतील हॉटेलमधील भीषण आग दुर्घटनेनंतर देशभरात अग्निसुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला असून, त्याच पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका आणि मुंबई अग्निशमन दलाने अंधेरीतील अग्निसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पाच उपहारगृहांवर कारवाई केली आहे. शुक्रवारी करण्यात आलेल्या संयुक्त तपासणीत अंधेरी (पश्चिम) येथील ‘वॉकमन बार’, ‘बोरा बोरा’, ‘चायना गेट’, ‘कारवान सेराई’ आणि ‘होमटाऊन हॉटेल अँड बार’ या आस्थापनांवर निष्कासन आणि जप्तीची कारवाई करण्यात आली. सहायक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक आरोग्य विभाग, अनुज्ञापन विभाग, इमारत व कारखाना विभाग तसेच मुंबई अग्निशमन दलाच्या संयुक्त पथकाने ही कारवाई केली. तपासणीदरम्यान या आस्थापनांनी नियमांनुसार राखीव असलेल्या अनिवार्य खुल्या जागेचा वापर स्वयंपाकघर आणि सेवा क्षेत्रासाठी केल्याचे आढळून आले. त्यामुळे अनधिकृत आच्छादने आणि बांधकामे हटविण्यात आली. तसेच १७ व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर, एक नायट्रोजन गॅस सिलिंडर, एक गॅस बँक, चार कुकिंग रेंज आणि मायक्रोवेव्ह ओव्हन जप्त करण्यात आले.
दरम्यान, ६ ते २० जून या कालावधीत मुंबईतील मॉल्स, तारांकित हॉटेल्स, लॉजिंग-बोर्डिंग, पार्टी हॉल, बँक्वेट हॉल, रूफटॉप रेस्टॉरंट्स, पब, नाईट क्लब, बार, ऑर्केस्ट्रा बार आणि जिमखान्यांची विशेष अग्निसुरक्षा तपासणी करण्यात येणार आहे. ही मोहीम नियमितपणे सुरू राहणार असल्याची माहिती अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त अश्विनी जोशी यांनी दिली. ‘महाराष्ट्र अग्निप्रतिबंधक व जीव संरक्षण उपाययोजना अधिनियम-२००६’नुसार सर्व अग्निसुरक्षा यंत्रणा कायम कार्यरत आणि सुस्थितीत ठेवणे बंधनकारक आहे. अग्निशामक यंत्रे, स्प्रिंकलर प्रणाली, अग्निसूचना व शोध यंत्रणा, किचन डक्टिंग, हायड्रंट व्यवस्था तसेच आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग कोणत्याही अडथळ्याशिवाय उपलब्ध ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याशिवाय वर्षातून दोन वेळा अधिकृत संस्थेमार्फत अग्निसुरक्षा तपासणी करून ‘फॉर्म-बी’ अनुपालन प्रमाणपत्र मुंबई अग्निशमन दलाकडे सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी अग्निसुरक्षा नियमांचे काटेकोर पालन करणे ही सर्व आस्थापनांची सामाजिक आणि कायदेशीर जबाबदारी असल्याचे आवाहनही प्रशासनाने केले आहे.







