मुंबई : इंधन दरवाढीचे परिणाम आता सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनावर स्पष्टपणे दिसू लागले आहेत. एलपीजी आणि पीएनजी गॅसच्या वाढलेल्या दरांमुळे घरगुती बजेट आधीच कोलमडले असताना, आता प्रवास खर्चातही वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मुंबईत दररोज लाखो प्रवाशांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचवणाऱ्या रिक्षांच्या भाड्यात वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे आधीच वाढत्या महागाईचा सामना करणाऱ्या मुंबईकरांच्या खिशावर आणखी ताण पडणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील (एमएमआर) रिक्षा भाडेवाढीच्या प्रस्तावाला वेग आला असून हा प्रस्ताव आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणाच्या (एमएमआरटीए) आगामी बैठकीत यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे लवकरच मुंबईकरांना रिक्षा प्रवासासाठी अधिक पैसे मोजावे लागू शकतात.
या संभाव्य भाडेवाढीमागे सीएनजीच्या दरांमध्ये झालेली सातत्यपूर्ण वाढ हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वीच राज्यभरात स्कूल बसच्या शुल्कात वाढ जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आता रिक्षा भाडेवाढीचा मुद्दाही पुढे आला आहे. मुंबई रिक्षामेन्स युनियनने यासंदर्भात प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) सविस्तर निवेदन सादर केले आहे. वाढत्या सीएनजी दरांमुळे सध्याच्या भाड्यात व्यवसाय चालवणे आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाल्याचा दावा रिक्षाचालक संघटनांनी केला आहे. त्यामुळे भाडेवाढ तातडीने लागू करण्याची मागणी करण्यात येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, किमान रिक्षा भाडे २३ रुपयांवरून थेट २७ रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास १ जुलैपासून नवीन दर लागू होऊ शकतात. यामुळे प्रत्येक प्रवासामागे किमान ४ रुपये अधिक मोजावे लागतील. तसेच मुंबईतील अनेक भागांत चालणाऱ्या शेअरिंग रिक्षांच्या भाड्यातही वाढ होण्याची शक्यता असून, महागाईच्या वाढत्या झळा सर्वसामान्यांना अधिक तीव्रतेने जाणवणार आहेत.







