कोल्हापूर : मराठी चित्रपटसृष्टीचे माहेरघर मानल्या जाणाऱ्या कोल्हापुरात अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीमुळे वातावरण चांगलेच तापले आहे. मेघराजराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालील समर्थ पॅनल आणि माजी अध्यक्ष विजय पाटकर, वर्षा उसगावकर व आनंद काळे यांच्या चित्रकर्मी पॅनलमध्ये चुरशीची लढत रंगली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांकडून आरोप-प्रत्यारोप सुरू असून माजी अध्यक्ष विजय पाटकर यांनी त्यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांना सडेतोड उत्तर दिले आहे. “माझ्यावरील आरोप सिद्ध झाल्यास मी चित्रपटसृष्टी सोडेन,” असा ठाम इशारा त्यांनी दिला. तसेच महामंडळावर प्रशासक नेमण्याची वेळ आल्याबद्दल खंत व्यक्त करत, गेल्या साठ वर्षांत प्रथमच अशी परिस्थिती निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले. महामंडळाचे आर्थिक अधिकार काढून घेण्यात आले असून दोन वर्षे खर्च करण्याचे अधिकार नसल्याबद्दल संबंधितांना लाज वाटत नाही का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, समर्थ पॅनलचे उमेदवार आणि महामंडळाचे माजी उपाध्यक्ष धनाजी यमकर यांनीही विजय पाटकर यांच्या आरोपांना जोरदार प्रत्युत्तर दिले. महामंडळाच्या कोल्हापूर, मुंबई आणि पुणे येथील स्वमालकीच्या इमारतींमुळे संस्थेचे मोठे आर्थिक नुकसान वाचल्याचा दावा करत, विनाकारण आरोप करण्यात येत असल्याचे त्यांनी म्हटले. तसेच महामंडळाचे थकीत पैसे प्रथम भरावेत, अशी मागणीही त्यांनी केली. निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला असून समर्थ पॅनलचे प्रमुख मेघराजराजे भोसले यांनी मुंबई आणि पुण्यात प्रचारावर भर दिला आहे, तर कोल्हापुरात धनाजी यमकर प्रचाराची धुरा सांभाळत आहेत. दुसरीकडे चित्रकर्मी पॅनलने कोल्हापुरातील देवल क्लब येथे कलाकारांशी संवाद साधत सभासदांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी आनंद काळे, मिलिंद अष्टेकर यांच्यासह अनेक सभासद उपस्थित होते. दरम्यान, बिनविरोध निवडून आलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी सर्वांचे आभार मानत, निवडणुकीत राजकीय हस्तक्षेप होऊ नये, असे मत व्यक्त केले. त्यांनी आपण राजकीय कुटुंबातून आल्याने राजकारणातील चढ-उतार परिचित असल्याचेही सांगितले.







