मुंबई : शहरातील सिग्नलवर भीक मागणारी किंवा छोट्या वस्तू विकताना दिसणारी अनेक मुले आजही शिक्षण आणि सुरक्षित बालपणापासून दूर आहेत. या अनाथ, एकल आणि दुर्लक्षित बालकांचे पुनर्वसन करून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाने ‘फिरते पथक’ ही विशेष योजना राबवली आहे. या योजनेला मिळालेल्या सकारात्मक प्रतिसादानंतर आता राज्यातील २२ जिल्ह्यांमधील ३१ क्षेत्रांमध्ये या योजनेचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भात मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून, स्वयंसेवी संस्थांकडून प्रस्ताव मागवण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. याबाबतची माहिती राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी समाजमाध्यमांद्वारे दिली. ‘फिरते पथक’ योजनेअंतर्गत विशेष वाहनांच्या माध्यमातून रस्त्यांवरील मुलांना पौष्टिक आहार, आरोग्य सेवा, शिक्षण, मनोरंजन आणि समुपदेशनाच्या सुविधा पुरवल्या जातात. तसेच या बालकांची आधार नोंदणी करून त्यांना मानसिक आधार देण्याचे कामही केले जाते. पालकांमध्ये शिक्षणाबाबत जनजागृती करून मुलांना शाळेत दाखल करण्यावरही भर दिला जात आहे.
नाशिक, पुणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे आणि नागपूर या सहा जिल्ह्यांमध्ये राबवण्यात आलेल्या या पथदर्शी योजनेत आतापर्यंत ३८०३ बालकांना विविध सेवा पुरवण्यात आल्या असून अनेक मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात यश मिळाले आहे. आता राज्यातील २८ महानगरपालिका क्षेत्रांसह मुंबई शहर, पूर्व उपनगर आणि पश्चिम उपनगर अशा एकूण ३१ क्षेत्रांमध्ये ही योजना सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. या योजनेत सहभागी होणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियमांतर्गत नोंदणी, निधी पोर्टलवरील नोंद, मागील तीन वर्षांचे लेखापरीक्षण अहवाल आणि संस्थेची नियमावली सादर करावी लागणार आहे. तसेच फिरत्या पथकांच्या वाहनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे आणि ट्रॅकिंग सिस्टीम बसविणे बंधनकारक राहणार असून ही यंत्रणा संबंधित पोलीस विभागाच्या समन्वयाने कार्य करेल. बाल कल्याण समिती, बाल हक्क आयोग आणि स्थानिक पोलीस प्रशासनालाही संबंधित संस्थांनी आपल्या कार्यक्षेत्राची माहिती देणे आवश्यक असणार आहे. शासनाने संपूर्ण प्रक्रिया गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून, या योजनेमुळे हजारो दुर्लक्षित बालकांना सुरक्षित आणि उज्ज्वल भविष्याची नवी संधी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







