पुणे : राज्यातील इयत्ता अकरावीच्या प्रवेश प्रक्रियेत पारदर्शकता आणि सुसूत्रता आणण्यासाठी शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागानं महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून अकरावीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पाच फेऱ्यांमध्ये राबवली जाणार आहे. त्यात नियमित तीन फेऱ्या, त्यानंतर ‘सर्वांसाठी खुला प्रवेश’ (Open to All) फेरी आणि मुलींसाठी विशेष फेरी असे स्वरूप असेल. तसेच १५ जुलै किंवा त्यापूर्वी वर्ग सुरू करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती शिक्षण विभागानं पत्रकाद्वारे दिली आहे.
सर्व विद्यार्थ्यांना एकाच ऑनलाइन अर्जाद्वारे राज्यातील महाविद्यालयांची निवड करता येणार आहे. किमान १ ते कमाल १० पसंतीक्रम नोंदवता येतील. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर पसंतीक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध होईल. पहिल्या फेरीनंतर दुसरी फेरी १० दिवसांनी तर पुढील प्रत्येक फेरीतील प्रवेश कमाल 8 दिवसांत पूर्ण करायचे आहेत. प्रवेश प्रक्रियेत अल्पसंख्याक, व्यवस्थापन आणि संस्थांतर्गत (इनहाऊस) कोटा यातील प्रवेशही ऑनलाइन पद्धतीनेच करावे लागतील. विद्यार्थ्यांनी अर्जात दिलेल्या माहिती आणि प्रत्यक्ष कागदपत्रांमध्ये तफावत आढळल्यास संबंधित विद्यार्थ्यांना विशेष फेरीपर्यंत प्रवेश प्रक्रियेतून वंचित ठेवले जाऊ शकते. पाचव्या फेरीनंतर पुढील प्रवेश फेरीत अशा विद्यार्थ्यांना संधी दिली जाईल, असं शिक्षण विभागानं स्पष्ट केलं. शुल्क परताव्याचे नवे नियमही जाहीर करण्यात आले आहेत. प्रवेश घेतल्यानंतर पहिल्या २० दिवसांत प्रवेश रद्द केल्यास शाळेनं जमा केलेल्या शुल्कापैकी ९० टक्के रक्कम परत मिळेल. त्यानंतर ६० दिवसांत प्रवेश रद्द केल्यास ८० टक्के शुल्क परत मिळेल. त्यापुढे शुल्क परत मिळणार नाही. परताव्याची रक्कम ऑनलाइन पद्धतीनं संबंधितांच्या बँक खात्यात जमा करणं बंधनकारक राहील. विलंब केल्यास पहिल्यांदा ५० हजार रुपये, त्यानंतर प्रत्येक वेळी १ लाख रुपयांचा दंड आकारण्याची तरतूद आहे. आरटीई, आयटीआय, तंत्रनिकेतनमध्ये प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत अर्ज मागे घेण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे असे विद्यार्थी नंतर पुन्हा केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊ शकतील.







