नाशिक : भाजीपाला वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या कॅरेट्सच्या आड वन्य प्राणी आणि पक्ष्यांची तस्करी करणाऱ्या टोळीचा नंदुरबार पोलिसांनी मोठा पर्दाफाश केला आहे. चित्रपटातील थरारक पद्धतीची आठवण करून देणाऱ्या या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा, वन विभाग आणि विसरवाडी पोलीस यांनी संयुक्तपणे सापळा रचत महाराष्ट्रातून गुजरातकडे सुरू असलेली कोल्हे आणि पक्ष्यांची बेकायदेशीर वाहतूक उघडकीस आणली. या कारवाईत पाच भारतीय कोल्हे, १९० तीतर पक्षी तसेच ९९ जंगली पोपट (अलेक्झांड्रिन प्रजाती) जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे, या सर्व वन्यजीवांना भाजीपाला कॅरेट्सच्या आड लोखंडी जाळ्या आणि पिंजऱ्यांमध्ये लपवून अत्यंत अमानवीय परिस्थितीत वाहतूक केली जात होती, ही बाब तपासात स्पष्ट झाली आहे.
नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, सुरत–अमरावती राष्ट्रीय महामार्गावर विसरवाडी परिसरात संशयित आयशर टेम्पोद्वारे वन्यजीवांची तस्करी होत असल्याचे समजले होते. त्यानुसार पोलिसांनी बॅरिकेडिंग करून वाहन अडवले असता हा प्रकार उघड झाला. जप्त करण्यात आलेल्या प्राणी-पक्ष्यांसह वाहन असा एकूण मुद्देमाल सुमारे २५ लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी शहजाद अहमद अतिक अहमद (४७), मोमीन मोहम्मद मोईन समसुल हक (३२), शेख सोहेल शेख अफजल कुरेशी (२४) तसेच मोहम्मद हुसेन आणि मोहम्मद मुस्तफा उर्फ गुलाम (सर्व रहिवासी मालेगाव) यांच्यासह इतर संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात हे सर्वजण मालेगावहून गुजरातमधील वडोदरा येथे वन्यजीवांची तस्करी करत असल्याचे समोर आले आहे. वनविभाग, पशुवैद्यकीय अधिकारी आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत जप्त केलेल्या प्राणी-पक्ष्यांची वैद्यकीय तपासणी केली असून त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. या तस्करीमागील नेमका उद्देश काय आणि यामागे मोठे आंतरराज्य रॅकेट आहे का, याचा सखोल तपास सध्या सुरू आहे.







