मुंबई : डिजिटल इंडिया मोहिमेला अधिक गती देत केंद्र सरकारने (Central Goverment) सर्वसामान्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. सरकारी सेवांचा लाभ सुलभ व्हावा, या उद्देशाने ‘उमंग’ (UMANG) ॲपमध्ये आता ‘मेरा राशन’ (Mera Ration) हे नवीन फिचर जोडण्यात आले आहे. या सुविधेमुळे रेशन कार्डधारकांना आता कार्यालयांचे चकरा न मारता आपल्या मोबाईलवरच सर्व माहिती पाहता येणार आहे. रेशन कार्डमधील नाव तपासणे, कुटुंबातील सदस्यांची माहिती अपडेट करणे किंवा जवळच्या स्वस्त धान्य दुकानाचा पत्ता शोधणे, यासाठी आता रेशनिंग ऑफिस किंवा डीलरवर अवलंबून राहण्याची गरज नाही. उमंग ॲपमधील या नवीन सुविधेमुळे पारदर्शकता वाढणार असून, लाभार्थ्यांना त्यांना मिळणाऱ्या धान्याचा अचूक कोटा आणि इतर तांत्रिक माहिती घरबसल्या पाहता येईल. ‘उमंग’ (Unified Mobile Application for New-age Governance) हे भारत सरकारचे अधिकृत ॲप आहे. एकाच प्लॅटफॉर्मवर केंद्र आणि राज्य सरकारच्या शेकडो सेवा पुरवणे हा यामागचा मुख्य हेतू आहे. यामध्ये आधीपासूनच आधार, पीएफ (PF), पेन्शन, गॅस बुकिंग, वीज बिल आणि पासपोर्ट यांसारख्या सेवा उपलब्ध आहेत. आता त्यात ‘मेरा राशन’चा समावेश झाल्याने रेशन कार्डधारकांसाठी हे ॲप ‘वन-स्टॉप सोल्यूशन’ ठरत आहे.
‘मेरा राशन’ फिचरची प्रमुख वैशिष्ट्ये :
- स्टेटस चेक : रेशन कार्ड सक्रिय आहे की नाही, हे त्वरित पाहता येईल.
- सदस्यांची माहिती : कार्डमध्ये किती सदस्यांची नावे आहेत आणि कोणाचे आधार लिंक आहे, हे तपासता येईल.
- जवळचे रेशन दुकान : तुम्ही ज्या भागात आहात, तिथल्या जवळच्या रेशन दुकानाचे लोकेशन मॅपसह शोधता येईल.
- पारदर्शकता : रेशन डीलरकडून होणारी फसवणूक रोखण्यासाठी लाभार्थ्याला त्याच्या हक्काच्या धान्याची माहिती आधीच मोबाईलवर मिळेल.
सुविधेचा वापर :
१. नोंदणी करा : सर्वप्रथम तुमच्या Android किंवा iOS फोनमध्ये ‘UMANG App’ डाऊनलोड करा. तुमच्या मोबाईल नंबरचा वापर करून लॉगिन किंवा रजिस्ट्रेशन करा.
२. सर्च आणि सेवा निवड : लॉगिन झाल्यानंतर ॲपमधील सर्च बारमध्ये “Mera Ration” टाईप करून सर्च करा. त्यानंतर मिळणाऱ्या पर्यायावर क्लिक करा.
३. तपशील नोंदवा : तुमचा रेशन कार्ड नंबर किंवा विचारलेली आवश्यक माहिती भरा. यानंतर तुमच्या स्क्रीनवर रेशन कार्डचा संपूर्ण डिजिटल गोषवारा दिसेल.
डिजिटल साक्षरता वाढत असताना रेशन कार्डाशी संबंधित ही सेवा ऑनलाईन झाल्यामुळे ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. रांगेत उभे राहून किंवा माहिती अभावी होणारी गैरसोय आता टाळता येईल.







