मुंबई : मुंबई हे शहर प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण करणारे शहर मानले जाते. या शहरात शिक्षण आणि रोजगारासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून हजारोजण येत असतात. मात्र खास करुन इथं येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मुख्य समस्या निर्माण होते ती म्हणजे राहण्याची. पण आता यावर एक म्हाडाने मोठा तोडगा काढला आहे. मुंबईत येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आता मुंबईतील काळाचौकी तसेच जिजामाता नगर येथे तब्बल १८ मजली वसतिगृह बांधण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे या वसतिगृहाचे काम हे २०२२ मध्ये सुरु झआले असून लवकर पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. सध्या ९० टक्के काम पूर्ण झाले असून दिवाळीपर्यंत प्रकल्पाचे काम पूर्ण होऊन ते वसतिगृह विद्यार्थ्यांसाठी सुरुही केले जाणार आहे. म्हाडाने एक सामाजिक दायित्व म्हणून साधारण सहा ते सात वर्षांपूर्वी मुंबई शहरात वसतिगृह बांधून विद्यार्थ्यांना आणि महिलांना तात्पुरता निवारा मिळण्याचा निर्णय घेतला होता त्यानुसार आता पहिला प्रकल्प हा काळाचौकीतील जिजामाता नगर येथे सुरु करण्याचा निर्णय घेऊन त्यासाठी आवश्यकही प्रक्रिया पूर्ण केलेली आहे.
वसतिगृहाचे वैशिष्ट :
- जिजामाता नगर येथील साधारण १५००० चौरस मीटर जागेवर वसतिगृहाची १८ मजली इमारत बांधण्यात येत आहे.
- विशेष बाब म्हणजे जेव्हा हे सुरु होईल तेव्हा ते मुंबईतील पहिले म्हाडाचे पहिले वसतिगृह ठरणार आहे. या वसतिगृहात साधारण ५०० तरुण-तरुणींची राहण्याची सोय होऊ शकेल.
- या १८ मजली होणाऱ्या वसतिगृहाच्या इमारतीच्या तळमजल्यापासून पाचव्या मजल्यापर्यंत व्यावसायिक गाळे असणार आहे. ज्यामुळे या वसतिगृहातील तरुण-तरुणींना बँकेसह आवश्यक सुविधा एकाच जागी मिळतील.







