मुंबई : मिरा भाईंदर शहरात सार्वजनिक ठिकाणी मोफत वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या संदर्भात शासनाकडून १० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून सल्लागार नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
आजच्या डिजिटल जगात वायफाय (Wi-Fi) अत्यंत आवश्यक आहे कारण ते आपल्याला इंटरनेटशी जोडते, ज्यामुळे ऑनलाइन कामं, मनोरंजन आणि माहिती मिळवणे सोपे होते. वायफायमुळे एकाच वेळी अनेक उपकरणांना इंटरनेटचा वेगवान आणि सोयीस्कर वापर करता येतो, ज्यामुळे घरात किंवा ऑफिसमध्ये कनेक्टिव्हिटीची गरज भागते. मिरा भाईंदर शहराचा विकास झपाट्याने होत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना प्राथमिक सुविधा उपलब्ध करून देण्यासह आधुनिक गोष्टीची उभारणी करण्याकडे प्रशासनाचा कल आहे. यात आता शहराला स्मार्ट करण्याच्या दृष्टीने आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी सार्वजनिक ठिकाणी मोफत वाय-फाय सेवा उपलब्ध करून देण्याची संकल्पना मांडली होती. मिरा भाईंदर शहरात प्रामुख्याने उद्यान, अभ्यासिका, सभागृह, शाळा, बस आगार, नाट्यगृह, शासकीय कार्यालय, मैदान व इतर महत्वाच्या ठिकाणाचा समावेश करण्यात आला होता. मात्र, यासाठी महापालिकेकडे निधीची कमतरता असल्यामुळे हे काम रखडले होते. दरम्यान या कामासाठी आता परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शासनाकडून यासाठी १० कोटींचा निधी मंजूर केला आहे.







